राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र शासनाकडून मुंबई पोलीस उपयुक्तांच्या बदल्यांना स्थगिती
उद्धव ठाकरे आणि शरद पवार पत्रकार परिषद (Photo Credits-ANI)

मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या मुंबईतील अंतर्गत बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी ट्विटरवरुन दिली. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Govt) मुंबई पोलीस उपयुक्तांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची 2 जुलैला बदली करण्यात आली होती. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट शुक्रवारी (3 जुलै) भेट घेतली होती. त्यानंतर या निर्णयात बदल करण्यात आल्याचे समजत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना महत्त्व होते.

महाराष्ट्रात कोरोना संकटाशी सामना करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजीचे सूर उमटले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख देखील उपस्थित राहणार असून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासात न घेता निर्णय घेतात, अशी तक्रार काही नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महत्त्वप्राप्त झाले आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन; 'ही' आहेत Mahajobs ची प्रमुख वैशिष्ट्ये

मुंबईकरांनी केवळ 2 किलोमीटर अतंरातच प्रवास करावा, या मुंबई पोलिसांच्या आदेशावरून शरद पवार यांनी नाराजी दर्शवली होती. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी दोन किलोमीटर परिघातच प्रवास मुभा हा नियम रद्द करून घराजवळच खरेदी करा, असे आवाहन नागरिकांना केले होते. तसेच महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णयदेखील ठाकरे सरकारने मित्र पक्षाला विश्वासात न घेताच घेतला होता, अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे.