'मी पुन्हा येईन हे जनतेला आवडले की नाही? याचा शोध घेईन' असे म्हणत भाजप नेते एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
देवेंद्र फडणवीस आणि आमदार एकनाथ खडसे (संग्रहित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. राज्यावर घोंगावत असलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार योग्य निर्णय घेत नसल्याचा आरोप वारंवार विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपल्याच पक्षामधील नेत्याच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दहा बारा वर्षांपूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. तसेच 'राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' हे जनतेला आवडले की नाही? याचा आता मी शोध घेणार असल्याचे म्हणत खडसे यांनी टोला लगावला आहे.

“निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत आहे. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचे एकट्याच्या बळावर सरकार आणले होते. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हतेसुद्धा. हे अलीकडे दहा बारा वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत”, असे एकनाथ खडसे हे आपल्या 68 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. हे देखील वाचा- Sardar Tara Singh Death Rumor: सरदार तारा सिंह यांच्या मृत्यूच्या बातम्या अफवा; अत्यावस्थ अवस्थेमधून लवकर बाहेर पडावेत यासाठी प्रार्थना करा: भाजपा नेते विनोद तावडे

 तसेच, एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी मोठी मेहनत घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात आपले सरकार होते, राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकुल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.