Nana Patole (PC - ANI)

Nana Patole On Reservation: काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षणाचा प्रश्न सोडवू, असं आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलं आहे. दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी सध्याचे सरकार पुरेशा उपाययोजना करत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पटोले यांनी समृद्धी महामार्गाशी निगडीत भ्रष्टाचार आणि सुरक्षेच्या प्रश्नांवरही प्रश्न उपस्थित केले. नाना पटोले यांनी आज टिळक भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले म्हणाले, 2014 पासून मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत भारतीय जनता पक्ष (भाजप) पोकळ आश्वासने देत आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना करू. भाजप सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून आरक्षणावरून समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे.

राज्यातील विविध भागात विशेषतः मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सरकार हा विषय गांभीर्याने घेत नाही. सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुरेशी चर्चा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी नाना पटोले यांनी केला. पटोले यांनी पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चार्‍याची नितांत गरज अधोरेखित केली आणि सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचं नमूद केलं. (हेही वाचा - Vijay Wadettiwar: टोलचा पैसा जातो कोठे? याची चौकशी झाली पाहिजे- विजय वडेट्टीवार)

तथापी, माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात उल्लेख असलेल्या वादग्रस्त जमीन घोटाळ्याकडे लक्ष वेधून पटोले यांनी पुस्तकात 'दादा' म्हणून उल्लेखलेल्या पालकमंत्र्यांच्या ओळखीबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यांनी या घोटाळ्यासंदर्भात 'दादा'वर असलेल्या दबावाबाबत चिंता व्यक्त केली आणि या प्रकरणातील सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पोलिस महासंचालकांच्या नियुक्तीमध्ये कथित राजकीय हस्तक्षेपाचा दाखला देत पटोले यांनी पोलिस प्रशासनाच्या सरकारच्या हाताळणीवरही टीका केली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्या गटाचे प्रमुख अजित पवार यांनी बोरवणकर यांनी खाजगी पक्षाला जमीन विकल्याबद्दलचे आरोप फेटाळून लावले. तसेच या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या कार्यालयातील निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, अशी प्रकरणे राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यापूर्वी महसूल विभागाकडे जातात आणि त्यावर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेते.

वैजापूर येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी संताप व्यक्त करत महामार्गावरील अपघातांच्या चिंताजनक आकडेवारीकडे लक्ष वेधले. त्यांनी या घटनांबद्दल सरकारच्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पटोले यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील शिंदे सरकारच्या काळात रस्त्यावरील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.