Coronavirus: माहाराष्ट्र नवनिर्माण सेना गुढीपाडवा मेळावा रद्द
MNS Leader Raj Thackeray (PHoto Credits-Twitter)

माहाराष्ट्र नवनिर्माण सेना गुढीपाडवा मेळावा (MNS Gudi Padwa Rally) रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्रावर गडद होत चाललेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हा निर्णय घेतला आहे. मनसे अधिकृत (MNS Adhikrut) या ट्विटर हँडलवर याबाबत एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकात ''कोरोनाचं सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत'', असं म्हटलं आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मनसे गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याचसोबत ''येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने ह्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात'', अशी मागणीही मनसेने केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवजयंती कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद येथे दाखल झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना व्हायरसला घाबरुन जाण्याचे कारण नाही. सरकार उगाचच सर्वसामान्य नागरिकांना घाबरवत आहे. भारतात आजाराने मृत्यू पावणाऱ्या नागरिकांची संख्या विचारात घेतली तर एकट्या टीबीमुळे शेकडो नागरिक मृत्युमूखी पडतात. त्यामुळे राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना घाबरवणे बंद करावे, असे मत राज ठाकरे यांनी केले होते. दरम्यान, भविष्यातील संकट ओळखून मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याची समयसूचकताही राज यांनी दाखवली आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात 365 दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे- राज ठाकरे)

मनसे ट्विट

कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या हळूहळू वाढत आहे. सुरुवातीला एक, दोन, तीन आणि पाचवर असलेली ही संख्या आता तब्बल 19 वर गेली आहे. शहरनिहाय रुग्णांची ही सख्या पाहता पुणे 9, मुंबई 3, ठाणे 1, नागपूर 4 आणि अहमदनगर 1 अशी ही रुग्णांची संख्या आहे.