Coronavirus: रक्ताचा मोठा तुटवडा, रक्तदान करा! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे जनतेला कळकळीचे अवाहन
Rajesh Tope (Photo Credits: ANI)

Please Donate Blood: कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट असले तरी रक्तदान करण्यास कोणतीही अडचण नाही. राज्यासमोर रक्ताचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. राज्याकडे पुढील 15 ते 20 दिवस पुरेल इतकेच रक्त आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे, असे अवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope) यांनी केले आहे. राज्यातील कोरोना व्हायरस संकट निवारण आणि त्याबाबतच्या उपाययोजना याबाबत राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी ते बोलत होते.

या वेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे. मात्र, केवळ राज्य सरकारकडून प्रयत्न करुन चालणार नाही. जनतेकडूनही त्याला तसेच सहकार्य मिळणे आवश्यक आहे. राज्यात जमावबंदी आहे, लॉकडाऊन स्थिती आहे. नागरिकांना घराबाहेर पडू नका असे अवाहन केले जात आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसी कारवाई केली जाईल, हे सर्व खरे असले तरी, रत्कदान करण्यावर मात्र कोणत्याही प्रकारचे बंधन नाही, असे राजेश टोपे यांनी सागितले.

नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. हे रक्तदान करताना या आधी आपण जसे मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यासठी कॅम्प आयोजित करायचो. तशा पद्धतीने रक्तदान करण्याची काहीच गरज नाही. तालुका किंवा जिल्हा पातळीवर छोटे केंद्र तयार करुन रक्तदान करावे. रक्तदान करत असतानाही कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही. परस्परांपासून ठरावीक अंतर (सोशल डीस्टन्स) ठेवणे आवश्यक असल्याकडेही राजेश टोपे यांनी लक्ष वेधले. भारत ब्लड बँकेकडे रक्तदान करा, असेही टोपे म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये अन्यथा पोलिसांकडून कारवाई करावी लागेल- आरोग्यमंत्री राजेश टोपे)

दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या आता 89 इतकी झाली आहे. काल आणि आज मिळून रुग्णसंख्या 15 वर पोहोचली. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा 89 वर पोहोचला. देशातील कोरोना व्हायरस बाधितांचाही आकडा जवळपास 400 पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. ही आकडेवारी सतत बदलत आहे. त्यामुळे कोणताही एक आकडा नक्की करता येतनाही. कोरोना संक्रमीत संशयितांचा आकडाही मोठा आहे. त्यात वाढही होत आहे. त्यामुळे राज्य सरकार दक्ष झाले आहे. म्हणूनच लॉकडाऊन करण्याचा आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जमावबंदी आणि लॉकडाऊन आदी पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे अवाहन केले जात आहे.