CM COVID19 Relief Fund: मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत 361 कोटींपेक्षा जास्त मदत; कोरोना व्हायरस लढ्यासाठी 123 कोटी खर्च, जाणून घ्या तपशील
Chief Minister Uddhav Thackeray's (PC - Twitter)

कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी केंद्रासह राज्य सरकार बरेच प्रयत्न करीत आहे. यासाठी, हॉस्पीटल्सची उभारणी, व्हेंटीलेटर, पीपीई कीट, मास्क, इतर यंत्रणा अशा गोष्टींवर बराच पैसा खर्च होत आहे. अशात महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी, जनतेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (Maharashtra CM COVID19 Relief Fund) मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत 361 कोटी 32 लाख 57 हजार 599 रुपये जमा झाले असून, यातील 123 कोटी 39 लाख 12 हजार 410 रुपये कोरोना विषयक विविध कारणांसाठी खर्च झाले आहेत.

आत्तापर्यंत 1 लाख 29 हजार दात्यांनी यामध्ये निधी दिला आहे. कोरोना विषाणू संकटाला सामोरे जाण्यासाठी, राज्य सरकार घेत असलेल्या उपायांवर बरीच रक्कम खर्च केली जात आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी समाजसेवी संस्था, उद्योग, धार्मिक संस्था आणि इतर लोक देखील मदत करत आहेत. अगदी हातावरचे पोट असणारे लोकही त्यांना जमेल तितकी मदत करत आहेत. याचे फळ म्हणजे आतापर्यंत मुख्यमंत्री निधीमध्ये कोरोना व्हायरससाठी 361 कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. आरोग्य सेवा, पोलीस यंत्रणा, चाचण्या, किट्स अशा अनेक गोष्टींवर ही रक्कम खर्च केली जात आहे. (हेही वाचा: CM Relief Fund: मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 मदत करण्यासाठी आवश्यक माहिती, बँक खाते क्रमांक, पोचपावती, पद्धत)

कोरोना व्हायरस लढ्यासाठी विनियोग –

  • औरंगाबाद जवळ रेल्वे अपघातातील मजुरांना- 80 लाख
  • सेंट जॉर्ज रुग्णालयासाठी- 20 कोटी,
  • कोविड चाचणीसाठी- 3 कोटी 82 लाख 50 हजार रुपये
  • श्रमिक रेल्वे तिकीटखर्च- 97 कोटी 69 लाख 55 हजार 490 रुपये
  • रत्नागिरी येथील प्रयोगशाळेसाठी- 1 कोटी 7 लाख 6 हजार 920 रुपये

Maharashtra CM Fund माहिती -

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Saving Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधी (cmrf.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, 'महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.'