
भारतामध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात मोठ्या आदराने ज्यांचं नाव घेतलं असे स्वरभास्कर म्हणजे पंडीत भीमसेन जोशी (Pandit Bhimsen Joshi). 2011 साली पंडीतजींनी वयाच्या 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि आता त्यांची पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही ही सल कायम अनेक शास्त्रीय संगीतावर प्रेम करणार्या रसिकाच्या, कलाकाराच्या मनात आहे. दरम्यान आज, 4 फेब्रुवारी 2021 पासून पंडीतजींच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात होत आहे. या दिवसाचं औचित्य साधत भीमसेन जोशींनी अजरामर केलेल्या काही कलाकृतींचा आज आस्वाद घेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा खास त्यांच्या आवजातील गाण्यांचा नजराणा.
पंडीत भीमसेन जोशी हे ख्याल गायकीसाठी विशेष प्रसिद्ध होते. त्यांच्यावर किराणा घराण्याच्या गायकीचे संस्कार झाले होते. शास्त्रीय गायनासोबत ख्याल, ठुमरी, उप शास्त्रीय आणि भजन या विविध प्रकारांवर त्यांनी आपली विशेष छाप सोडली होती. भारत सरकारने त्यांना भारत रत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं आहे.
मिले सूर मेरा तुम्हारा
भारतीय संस्कृतीमधील विविधतेत एकता या थीम वर आधारित 'मिले सूर मेरा तुम्हारा' हा खास व्हिडिओ आहे. यामध्ये सुरूवातीचा भाग पंडितजींनी गायला आहे.
बाजे मुरलिया बाजे..
बाजे मुरलिया गाण्यामध्ये पंडीतजींसोबत गानकोकिळा लता मंगेशकर यांनी त्यांना साथ दिली होती. संगीत क्षेत्रातील दोन शिरोमणींच्या क्वचितच रेकॉर्ड केलेल्या गाण्यांमध्ये याचा समावेश आहे. राम शाम गुण गाण मधील हे गाणं आहे.
याच साठी केला होता अट्टाहास
संतवाणी मध्ये श्रीनिवास खळे यांच्या संगीतबद्ध केलेल्या अभंगाला पंडीत भीमसेन जोशींचा स्वरसाज आहे.
तीर्थ विठ्ठल
राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेल्या तीर्थ विठ्ठल या अभंगाची खास जागा आहे. हा मूळचा नामदेवांचा अभंग आहे.
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
मराठी सोबतच पंडीतजींची कन्नड भाषेतही अनेक अभंग प्रसिद्ध आहे. त्यापैकीच एक भाग्यदा लक्ष्मी बारम्मा आजही लोकप्रिय आहे.
टाळ बोले चिपळीला
पंडीतजींच्या पुण्यातील निकटवर्तीयांपैकी वसंतराव देशपांडे होते. त्यांच्यासोबत त्यांनी गायलेले टाळ बोले चिपळीला आजही लोकांच्या मनात विशेष जागा करून आहे.
पंडीत भीमसेन जोशी यांनी अनेक शिष्य घडवले. पंडीत जयतीर्थ मेवुंडी, आनंद भाटे यांच्यासारखे त्यांचे शिष्य पंडीतजींचा वारसा पुढे चालवत आहेत. पंडीतजींचा मुलगा आणि नातू देखील संगीत क्षेत्रामध्ये आहेत. भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ 1952 सालापासून सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. आता हाच सोहळा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव म्हणून साजारा केला जातो.