राहुल गांधी यांना Enjoyment साठी जम्मू कश्मीर मध्ये जायचं असेल तर आम्ही सोय करू: संजय राऊत
संजय राऊत (Photo Credits: ANI)

कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) व त्यांच्या साथीदारांना शनिवारी (25 ऑगस्ट) जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) विमानतळावरून माघारी पाठवल्याने अनेक चर्चा आणि राजकारण तापलं होते. मात्र जम्मू कश्मीर प्रशासनाच्या या निर्णयाचं आज (25 ऑगस्ट) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कौतुक केलं आहे. कश्मीर प्रशासनाच्या या निर्णायाला पाठिशी घालत संजय राऊत यांनी जर राहुल गांधींना कश्मीर मध्ये मौज मजेसाठी जायचं असेल तर आम्ही त्याची सोय करू असं म्हटलं आहे. जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्याने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात- राहुल गांधी

दिल्लीमध्ये मीडीयाशी बोलताना संजय राऊत यांना राहुल गांधींना श्रीनगर एअरपोर्टवरून परत पाठवण्याच्या कश्मीर प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा राऊत यांनी जर राहुल गांधींना कश्मीर फिरण्यासाठी आणि मौज मजेसाठी तेथे जायचं असेल तर आम्हांला सांगा, पर्यटन विभागाशी बोलून आम्ही त्यांची सोय करतो. राहुल गांधींना परत पाठवण्याचा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आला होता. त्यांना कश्मीरमध्ये येऊ दिल्याने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला असता असेही त्यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू कश्मीर मधून कलम 370 रद्द करण्यात आले आहे. यानंतर कश्मीरमध्ये सद्यस्थिती काय आहे? हे पाहण्यासाठी कॉंग्रेसच्या राहुल गांधींसोबत TMC, RJD, NCP सारख्या विरोधी पक्षांतील काही नेत्यांचे एक मंडळ जम्मू कश्मीरला निघाले होते. मात्र या मंडळाला श्रीनगर एअरपोर्ट वरूनच दिल्लीला परत पाठवण्यात आले.