पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत सोमवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. भारतीय हवामान विभागाने (IMD) केवळ पुणेच नव्हे, तर उर्वरित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून पुढील काही तास गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.
पुणे शहरात पावसाची हजेरी
पुण्यातील शिवाजीनगर, कोथरूड, पाषाण, हडपसर आणि सिंहगड रोड परिसरांत दुपारी अचानक ढग जमा होऊन पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्याने सखल भागात पाणी साचले होते. उन्हाच्या कडाक्याने त्रस्त असलेल्या पुणेकरांना या पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी सायंकाळच्या वेळी कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
Pune | Hailstrom | Unsessional Rain | औंध,बाणेर, मावळमध्ये अवकाळी पावसाच्या सरी#pune #hailstrom #unsessionalrain #ndtvmarathi pic.twitter.com/KrN5iAKjU9
— NDTV Marathi (@NDTVMarathi) March 30, 2026
गारपिटीचा इशारा आणि सतर्कता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेती पिकांचे नुकसान
अवकाळी पाऊस आणि संभाव्य गारपिटीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. सध्या काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि द्राक्ष बागांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आंबा आणि काजू पिकावरही याचा विपरीत परिणाम होण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.