Monsoon: येत्या 24 तासात मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकणार
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लवकरच एक खुशखबर मिळणार आहे. कारण, नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून (Monsoon) येत्या 24 तासात केरळ राज्यात दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. खरे तर ही खुशखबर आणखी लवकर मिळणार होती. मात्र, मान्सूनचं आगमन दोन दिवसांनी लांबणीवर पडल्याने महाराष्ट्रातही मान्सूनची आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. या आधी 6 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होईल असं सांगण्यात येत होते.

कसा असतो मान्सूनचा प्रवास?

सर्वात आधी मान्सून कोरळच्या किनारपट्टीवरुन भारतात दाखल होतो. त्यानंतर हळूहळू तो देशभर प्रवास करतो. आजवरचा इतिहास पाहता मान्सून जेव्हा केरळमध्ये दाखल होतो तेव्हा तिथून पुढे साधारण आठवडाभरामध्ये महाराष्ट्रात दाखल होतो. आतापर्यंत सर्वसाधारणपणे मान्सून हा 1 जुन रोजी केरळमध्ये दाखल होतो असे मानले जात असे. गेली अनेक वर्षे त्यात थोड्याफार फरकाने सातत्याही होते. मात्र, अलिकडील काही वर्षांमध्ये निसर्गात होत असलेले बदल पाहता निसर्गचक्रच बदलताना पाहायला मिळते आहे. त्यामुळे केरळमध्येही मान्सूनचे अनेकदा आगमन उशीरा होते. (हेही वाचा, मान्सून 6 जूनपर्यंत केरळात धडकण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज)

दरम्यान, यंदाचा मान्सून हा दक्षणेपासून उत्तरेकडे सरकायला साधारण पाच ते सात दिवसांचा विलंब लागेन. जूनमध्ये यंदा देशभारत सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असेही सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मागे लागलेले दुष्काळाचे शुक्लकाष्ट कसे संपणार हा प्रश्न उपस्थित होतो आहे.