BMC Election 2021: मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी शक्य ते सर्व करु; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचा शिवसेनेला इशारा
Prasad Lad (Photo Credit: ANI)

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election 2021) पुढील वर्षी होत आहे. मात्र, त्यासाठी भाजपने (BJP) आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. राज्यात शिवसेनेने (Shiv Sena) साथ सोडल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तुळातील मानले जाणारे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी शक्य ते सर्व करु, असे शिवसेनेला इशारा देणारे विधान केले आहे.

प्रसाद लाड यांनी जवळपास पाऊणतास राज ठाकरे यांच्याशी कृष्णकुंजवर चर्चा केली आहे. दरम्यान, प्रसाद लाड आणि राज ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, ज्यावेळी प्रसाद लाड हे कृष्णकुंजवर आले होते, तेव्हा त्यांचे स्वागत दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर खुद्द राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी केले होते. यामुळे येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र लढणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. महत्वाचे म्हणजे, प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस यांचा कोणता निरोप घेऊन राज ठाकरेंची भेट घेतली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. हे देखील वाचा- Mumbai Local Mega Block Update: रविवारी रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम मार्गांवर मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

राज ठाकरे यांची भेट घेऊन कृष्णकुंजमधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद लाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान ते म्हणाले की, माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंधत आहे. तसेच ही भेट वैयक्तिक आहे. मात्र, त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीबाबतही प्रश्न विचारण्यात असता ते म्हणाले की, मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्याचा पक्षाचा निर्धार आहे. शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी शक्य ते सर्व करु, असेही प्रसाद लाड म्हणाले आहेत.