उद्धव ठाकरे म्हणतात 'आम्ही दगा दिला नाही, तुम्ही देऊ नका; युतीची सत्ता आल्यावर अधिकार आणि जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप होणार'
Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo Credit: You Tube)

Lok Sabha Elections 2019: ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भूमिकेला आपला विरोध आहे. ‘काँग्रेसमुक्त देश किंवा काँग्रेस नष्ट करा असं मी कधीच बोललो नाही. मुळात विरोधी पक्ष असायलाच हवा,’असे सांगतानाच शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी मित्रपक्ष भाजपलाही इशारा दिला आहे. 'आम्ही दगा दिला नाही, तुम्ही देऊ नका; युतीची सत्ता आल्यावर अधिकार आणि जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप होणार', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकसभा निवडणुकींच्या प्रदीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

'विरोध करणं म्हणजे आकांडतांडव करणे नव्हे'

‘मुख्यमंत्र्यावर तर जबाबदारी असतेच पण विरोधी पक्षनेत्यावर त्याहून मोठी जबाबदारी असते. मुळात विरोध करणं म्हणजे आकांडतांडव करणे असं नाही. विरोधी पक्षनेत्यासुद्धा जबाबदारी असते. जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्याला जास्त पार पाडावी लागते,’, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याचे उद्धव ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

'काँग्रेसमुक्त भारत ही फालतू कल्पना'

मुलाखतीदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अनेक मुद्दयांवर शिवसेना पक्ष म्हणून आपली सहमती दर्शवली. मात्र, भाजपचे काही मुद्दे आणि भूमिका यांना विरोध असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपच्या काँग्रेसमुक्त भारत या संकल्पनेलाही त्यांनी विरोध दर्शवला. इतकेच नव्हे तर, काँग्रेसमुक्त भारत ही फालतू कल्पना असल्याचे उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये सांगितले. (हेही वाचा, PM Modi in Wardha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील सभेवेळी मैदान अर्ध रिकामं; राजकीय वर्तुळात वाऱ्याची दिशा बदलल्याची चर्चा)

उद्धव ठाकरे मुलाखत

'मनमोहन सिंगांनीसुद्धा पहिली पाच वर्षं चांगलंच काम केलं'

‘काँग्रेस नष्ट करा किंवा काँग्रेसमुक्त किंवा हे मुक्त, ते मुक्त असल्या फालतू कल्पना माझ्याकडे नाहीत. आज काँग्रेसची अवस्था ही निर्णायकी आहे हे नक्की. त्यांच्याकडे आता नेतृत्व म्हणून नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्यासारख्या उंचीची नेते मंडळी नाहीत,’असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. ‘मनमोहन सिंगांनीसुद्धा पहिली पाच वर्षं चांगलंच काम केलं पण त्या दर्जाची माणसं आता पक्षात दिसत नाहीत,’ असे कौतुकोद्गारही उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीदरम्यान काढले.