विरोधकांच्या डोक्यावर दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही; सामना अग्रलेखातून शिवसेनेची भाजपवर टीका

महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत. दरम्यान, देशात संचारबंदीच्या (Lockdown) परिस्थितीतही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशा नागरिकांना पोलिसांचा मार खावा लागत आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर (Maha Vikas Aghadi) जोरदार निशाणा साधला होता. एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभर जणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर, त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे, असे सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच ठाकरे सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनाही सडतोड उत्तर दिले आहे. गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दुंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नसल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे.

सामना अग्रलेखात काय म्हटले आहे?

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशेच्या घरात गेला आहे. हे लक्षण चांगले नाही. राज्यात दोनशे व संपूर्ण देशात हजारांवर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे, पण लोकांना या महामारीचे गांभीर्य खरंच समजले आहे काय? कोरोनाची समस्या अशी आहे की दाबण्यासाठी हिंदू-मुसलमान असा खेळ करूनही उपयोग नाही. मंदिर, मशीद, शाहीन बाग वगैरे पत्ते पिसूनही कोरोनावरील मात शक्य नाही. येथे सरकारला कष्ट करावे लागतील व जनतेला स्वयंशिस्त पाळावी लागेल. सरकारने 21 दिवसांचे `लॉक डाऊन’ जाहीर करूनही लोक रस्त्यावर उतरतात, गर्दी करतात. पुन्हा पोलिसांनी दंडुके उगारले तर हे कायद्याचे राज्य आहे काय असा प्रश्न विचारतात. होय, हे कायद्याचेच राज्य आहे. म्हणूनच पोलीस फक्त दंडुक्याचा वापर करीत आहेत. चीनसारखे राष्ट्र असते तर काय झाले असते सांगता येत नाही.

रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस दंडुके मारतात म्हणून सरकारवर टीका केली जात आहे. मग महाराष्ट्र वाचविण्यासाठी काय करायला हवे, याचेही मार्गदर्शन टीकाकारांनी करावे. इराणमध्ये रस्तोरस्ती, इटलीच्या चौकाचौकांत कोरोना रुग्णांचे मुडदे पडत आहेत. तसे मुडदे येथील रस्त्यांवरही पडू द्यायचे काय? डॉक्टरांवर ताण आहे तसा पोलिसांवरही आहे. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर टीकेची झोड उठवून तुम्ही कोरोनाला बळ देत आहात. पण घसरलेल्या गाडीत बसणाऱया विरोधकांना हे सांगायचे कोणी? महाराष्ट्रातील सर्व आमदार व खासदारांनी (भाजप वगळून) त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री मदतनिधीत जमा केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी टाटा, बजाज, अझिम प्रेमजी, अंबानी अशा उद्योगपतींनी मोठे योगदान दिले, पण राज्यातील विरोधी पक्षाने त्यांच्या आमदार-खासदारांसाठी काय फर्मान काढावे? तर त्यांचे एक महिन्याचे वेतन त्यांनी भाजपच्या राहत कोषात जमा करायचे आहे. म्हणजे अशा संकट काळातही विरोधी पक्षाने त्यांचा सवतासुभा केला आहे. संकटात हे लोक एकत्र येण्यास तयार नाहीत. त्यांना मुख्यमंत्री व त्यांचा मदतनिधी आपला वाटत नाही. अशा विरोधी पक्षाला सामाजिक भान तर नाहीच, पण त्यांचे वागणे राष्ट्रीय एकोप्याच्या विरोधी आहे. म्हणूनच अशा कठीणप्रसंगी असे संकुचित विचारांचे लोक सत्तेवर नाहीत याचा महाराष्ट्राला अभिमान आहे.

एकेकाळी युतीत राहून एकसोबत निवडणुका लढवणारी भाजप- शिवसेना आता एकमेकांचे विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असून विरोधीपक्षाकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी गमावली जात नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच फेसबूक लाईव्ह करत असताना विरोधी पक्षनेते आपल्यासोबत असल्याचे विधान केले होते.