जालना येथे वीज पडून तीन जणांचा मृत्यू तर सांगली, नाशिकला परतीच्या पावसामुळे झोडपल्याने स्थानिकांची तारांबळ
Monsoon 2019 (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. तर गेल्याच महिन्यात पुणे येथे झालेल्या पावसामुळे अनेकांचे नुकसान होत 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर आता पुन्हा एकदा सांगली, नाशिक येथे झालेल्या परतीच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली दिसून आली. दुसऱ्या बाजूला जालना येथे वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच सांगली, नाशिक येथे शनिवार रात्री पासूनच पावसाच्या सरी कोसळू लागल्याने शहराला झोडपून काढले. तासगाव तालुका येथे ही मुसळधार पावसामुळे नदी तुडूंब भरली. दुष्काळ भागात पाऊस पडल्याने तेथील स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.

तर जालना येथे पावसामुळे वीज पडून तीन जणांना आपला जीव गमवावा लागला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. शेतात काम करत असता वीज पडल्याने ही घटना घडली आहे. तसेच जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(Mumbai Rains: 31 जुलैपर्यंतचा पाऊस हा गेल्या 60 वर्षांमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस)

तसेच 7 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर पर्यंत पुढील पाच दिवस राज्यात वादळी वाराऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.  विदर्भ, मराठड वाडा आणि मध्य महाराष्ट्रमधील काही ठिकाणी दुपार नंतर पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्याचसोबत नागरिकांनी हवामानाच्या स्थितीनुसार शेतीच्या नियोजनासह स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात, सरासरीपेक्षा 32 टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे, तर महाबळेश्वर हे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे.