Mercedes Benz घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला 'फकीर' म्हणू नये; शिवसना खासदार संजय राऊत यांची टीका
Sanjay Raut Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक सामना या शिवेसेना (Shiv Sena) मुखपत्रातील आपल्या 'रोखठोक' (Rokhthok) या साप्ताहीक सदरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नव्या मर्सिडीज बेन्झ (Mercedes Benz) गाडीवरुन टीका केली आहे. ही गाडी 12 कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जाते. 2021 हे साल तर सरले. पण किमाण 2022 या नव्या वर्षात तरी आशेची किरणे दिसणार का? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी म्हटले आहे की, 'महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. मात्र, पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहेट. मर्सिडीज बेंज घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तरी स्वत:ला 'फकीर' म्हणने बंद करावे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हटले आहे 'रोखठोक'मध्ये?

  • ''2021 अनेक जळमटे तशीच ठेवून सरले आहे. तेच निर्बंध, तेच सर्व प्रश्न 2022 च्या झोळीत टाकून 2021 सरले तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला असे चित्र दिसले नाही. 2020 मावळताना 2021 वर्षाला गोंधळ व अराजकाची भेट दिली. 2021 ने 2022 ला तोच नजराणा पुढे दिला. मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे''. (हेही वाचा, Sanjay Raut On PM: पंतप्रधान मास्क घालत नाही म्हणून मीही घालत नाही, संजय राऊतांचे वक्तव्य)
  • ''28 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या 12 कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाड्या वापरतात''.
  • ''पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. तामीळनाडूच्या गर्दीत राजीव गांधी गेले व लिट्टेकडून मारले गेले. हे त्यांचे साहस होय. त्यांनी असे साहस करायला नकोच होते, पण केले. पंतप्रधान मोदींची 12 कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे''.

''पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून मोदी व सरकार 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहेत. मोदी यांचे वृत्तवाहिन्यांवरील रोजचे ‘दर्शन’ पाहिले तर तेच स्वतः भ्रमंतीसाठी वेळ आणि पेट्रोल किती खर्च करीत आहेत ते लक्षात येते. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती, बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झाले ते पुरे झाले. 2022 सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे'', असेही संजय राऊत यांनी आपल्या लेखात शेवटी म्हटले आहे.