Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील आगीच्या घटनांमध्ये (Mumbai Fire Incidents) वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (FSAI) ने म्हटले आहे की, संपूर्ण मुंबईमध्ये विद्युत आगीच्या घटनांमध्येहोणारी वाढ ही बाब, तातडीने प्रतिबंधात्मक कारवाईचे महत्व अधोरेखित करते. त्यांनी म्हटले आहे की, मुंबईतील सुमारे 70% आगी या इमारतींमधील सदोष विद्युत पायाभूत सुविधांमुळे लागलेल्या आहेत. मुंबईतील कमला मिल्स कंपाऊंडमधील 15 मजली टाईम्स टॉवरला 6 सप्टेंबर रोजी आग लागली, ही अलीकडच्या काही वर्षांतील तिसरी आगीची घटना आहे. यामध्ये कोणतीही दुखापत झाली नसली तरी, आगीने 7व्या आणि 10व्या मजल्यांमधील कार्यालयाच्या जागेचे नुकसान केले.

इमारतीच्या ऑपरेशनल अग्निशामक यंत्रणेने ज्वाला आटोक्यात आणण्यास मदत केली असली तरी, या घटनेने काचेच्या इमारतींसाठी अग्निसुरक्षा नियमांबद्दल नव्याने चिंता निर्माण केली आहे. एफएसएआय (FSAI) नुसार, दाट लोकवस्ती असलेल्या मुंबई शहरात, तब्बल 70 ते 80 टक्के आगीच्या घटनांचे कारण हे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये, विशेषत: उंच इमारतींमध्ये, अकार्यक्षम अग्निशमन उपकरणांमुळे नुकसानीचे प्रमाण वाढले होते.

अशा घटना टाळण्यासाठी आणि त्यांचे परिणाम कमी करण्यासाठी कडक सुरक्षा उपाय आणि विद्युत यंत्रणा व अग्निशामक उपकरणे या दोन्हींच्या नियमित देखभालीची तातडीची गरज असल्याचे दिसून येते. फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे (FSAI) अजित राघवन म्हणाले, ‘मुंबईसारख्या उच्च घनतेच्या शहरी भागात विजेच्या आगीमुळे जीव आणि मालमत्तेला गंभीर धोका निर्माण होतो. निकृष्ट विद्युत सामग्रीचा व्यापक वापर, तसेच विद्युत आणि अग्निशामक यंत्रणेची खराब देखभाल यामुळे आगीच्या घटनां वाढतात. शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी आणि इमारतींच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कॉपर कंडक्टरसारख्या उच्च-गुणवत्तेच्या, अग्निरोधक सामग्रीच्या वापरास प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.’

राघवन म्हणाले की, विद्युतीय आगीमध्ये योगदान देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे निकृष्ट दर्जाच्या तारा आणि केबल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर, अनेकदा निकृष्ट कंडक्टर सामग्रीपासून बनवल्या जातात, ज्यामुळे शॉर्ट सर्किट आणि आग लागण्याचा धोका वाढतो. सार्वजनिक सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी, ग्राहकांनी उच्च-गुणवत्तेच्या विद्युत घटकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Mumbai Rental Costs: मुंबईमधील 1BHK अपार्टमेंटचे सरासरी मासिक भाडे 43,138 रुपये; नागरिकांचा पगार आणि भाडे खर्च यांच्यात मोठ्या प्रमाणात असमानता- CREDAI-MCHI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 जुलै रोजी राज्य विधान परिषदेत सांगितले होते की, मुंबईत गेल्या तीन वर्षांत 13,000 आगीच्या घटना घडल्या आहेत, परिणामी 65 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही चिंताजनक आकडेवारी भविष्यातील घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहरात अग्निसुरक्षा उपाय आणि पायाभूत सुविधा सुधारण्याची तातडीची गरज हायलाइट करते.