Maharashtra Unlock 5.0: महाराष्ट्रात लवकरच Restaurants सुरु होण्याची शक्यता; रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार, अंतिम झाल्यावर निर्णय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

सध्याच्या कोरोना विषाणू (Coronavirus) काळात सरकारने अनलॉक (Unlock) अंतर्गत अनेक नियम शिथिल केले आहेत. सध्या बऱ्याच आर्थिक घडामोडी सुरु असल्या तरी रेस्टॉरंट (Restaurants), मंदिरे, जिम अशा काही गोष्टींबाबत राज्य शासनाने अजूनही निर्णय घेतले नाहीत. आत महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून, ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज याबाबत माहिती दिली. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे कोरोनासोबत जगतांना अत्यंत काळजीपुर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरु करत आहोत. व्यवहार बंद ठेवणे हा काही आवडीचा विषय असूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कर रुपात राज्य शासनाला मिळणारा महसूल ही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची शासनास जाणीव आहे म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळित करण्याचा आपला प्रयत्न आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘सध्याच्या काळात रेस्टॉरंट मालकांची त्याचे ग्राहक व कर्मचारी यांच्याप्रती मोठी जबाबदारी आहे. कोविडमुळे कोरोना योद्धेही बाधित झाले आहेत, दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळित करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेऊन सुरु करत आहोत. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ती त्यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच नाही. सध्या जीवनशैलीत बदल करताना मास्क लावणे, हात धुणे,  शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करतांना या तीनही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.’ (हेही वाचा: ‘कोव्हीशिल्ड’ लस चाचणी दरम्यान मृत्यू झाल्यास स्वयंसेवकाच्या कुटुंबाला मिळणार 1 कोटी रुपये)

या विषाणुने बाधित 80 टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी, त्यांच्याकडून विषाणुचा प्रसार होऊ शकतो जी बाब गंभीर आहे. हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, ‘एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसीपी आहे.’ त्यामुळे सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हाँटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, श्री. गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलिप दतवाणी, रियाझ अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के.भाटीया आदी मान्यवर उपस्थित होते.