Mahajanadesh Yatra: देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानदेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला उद्या पासून सुरुवात; नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार समारोप
Narendra Modi ,Devendra Fadnavis (Photo Credits: PTI, Instagram)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Mahrashtra Assembly Election 2019) रणशिंग फुंकताच सर्वत्र प्रचारसत्राची सुरुवात झाली होती. आता येत्या दोन ते तीन दिवसात निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर होणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचा (Mahajanadesh Yatra) तिसरा टप्पा 13 सप्टेंबर ते गुरूवार 19  सप्टेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती समोर येत आहे.  उद्या 13 सप्टेंबर रोजी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले येथून जनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरु होईल होईल. तसेच 19 सप्टेंबर रोजी नाशिक(Nashik) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत ही यात्रेचा समारोप होईल असे वृत्त आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व महाजनादेश यात्राप्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या  माहितीनुसार, महाजनादेश यात्रेच्या  तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा 13 जिल्ह्यातील 60 विधानसभा मतदारसंघातून 1,528 कि. मी. प्रवास करणार आहे. यानंतर गुरूवारी 19  सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे महासभेने महाजनादेश यात्रेचा समारोप होईल. विशेष म्हणजे तत्पूर्वी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे हे सुद्धा भाजपात प्रवेश करणार असल्याने 15 सप्टेंबरला राजे सुद्धा जनादेश यात्रेत सहभागी होणार असल्याचे माध्यमात सांगितले जात आहे.

महाजादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील यात्रेचा समारोप सोलापूर येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झाला होता. सुरुवातीच्या दोन टप्प्यात राज्यातील 24 जिल्ह्यातील 106 विधानसभा मतदारसंघातून 2208 कि. मी. प्रवास झाला होता.

दरम्यान, राज्यात शिवसेना भाजपा युतीबाबतही विविध चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दोन्ही पक्षातील नेतेमंडळींमद्ये अलीकडेच एक खास मीटिंग झाली होती, ज्यामध्ये 288 पैकी शिवसेनेला 106 जागांवर निवडणूक लढवता येईल असे समजत आहे, मात्र आपण 120 च्या खाली जागांवर तयार होणार नसल्याचा पवित्र शिवसेनेने स्वीकारला आहे.