Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल; दिलीप वळसे पाटील 'वर्षा' बंगल्यावर

अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन सीबीआयने काही शोधमोहीम हाती घेतली. त्यानतर राज्यातही काही घडामोडी घडू लागल्या आहे. गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले आहेत.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल; दिलीप वळसे पाटील 'वर्षा' बंगल्यावर
Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांच्याविरोधात सीबीआय (CBI) या केंद्रीय तपास यंत्रणेने FIR दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपामुळे अनिल देशमुख यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यानंतर देशमुख यांच्यामागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागला. दरम्यान, सीबीआयने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केलाच आहे. सोबतच देशमुख यांच्याशी संबंधीत विविध ठिकाणी शोधमोहीमही हाती घेतली आहे. देशमुख यांच्याशी संबंधीत 10 ठिकाणी सीबीआयची पथकं शोधाशोध करत असल्याचे वृत्त आहे. यात दिल्लीतील सीबीआय आणि महाराष्ट्रातील सीबीआय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.

अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन सीबीआयने काही शोधमोहीम हाती घेतली. त्यानतर राज्यातही काही घडामोडी घडू लागल्या आहे. गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात होत असलेली ही बैठक पूर्वनियोजीत आहे की ती अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर निश्चित करण्यात आली आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतू राज्यातील घडामोडींना मात्र वेग आल्याचे स्पष्ट दिसत आहे. (हेही वाचा, Anil Deshmukh CBI Enquiry: भ्रष्टाचार प्रकरणात CBI ची कारवाई सुरू; अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांना समन्स)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्या भरलेली एक स्कॉर्पिओ सापडली होती. या प्रकरणात एपीआय अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. सचिन वाझे हे सध्या निलंबीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचीही बदली करण्यात आली. या बदलीनंतर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये जमवून देण्याचा आरोप केला. पत्र लिहून केलेल्या या आरोप प्रकरणावरुन महाराष्ट्रात गदारोळ झाला. अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ ठेवणे. त्यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप होणे, त्या प्रकरणी त्यांना अटक होणे. यात पुढे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली होणे आणि त्यांनी थेट गृहमंत्र्यांवर आरोप करणे आदींमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे होऊ लागले आहे. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरु असल्याने भविष्यात हे प्रकरण कोणत्या दिशेला जाईल, याबाबत उत्सुकता आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2021 10:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).