Jalna Road Accident: समृद्धी महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg) अद्याप रहदारीसाठी सामान्यांना अधिकृतपणे सुरू झालेला नाही पण अनेकजण यावर सुस्साट वाहनं चालवत असल्याने अजून एक अपघात या महामार्गावर झाला आहे. जालना (Jalna) मधील तांदुळवाडी शिवारामध्ये काल अशाच प्रकारे एक भरधाव वेगात असलेली कार नाल्यात उलटल्याने गाडी चक्काचूर झाली असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचं नाव बळीराम खोकले असून त्यांचंवय 45 वर्ष आहे.

औरंगाबादहून समृध्दी मार्गाने मेहकरकडे जात असताना हा अपघात झाला आहे. पावसामुळे वाहकाचं गाडीवरील कंट्रोल सुटला आणि पलटी मारत चारचाकी एका नाल्यात पडली. त्यामध्ये गाडीचं नुकसान झालं आहे. एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी आहेत. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं संगितलं जात आहे.

जखमींवर नजिकच्या रूग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर मृताचा अकस्मित मृत्यू नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Maharashtra Samruddhi Mahamarg: उद्घाटनापूर्वीच सुरू झाला समृद्धी महामार्ग? काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला प्रवास (Watch Video) .

समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी नागरिकांना अद्याप  खुला झाला नाही  तरी नागरिक त्यावरून भरधाव वाहने नेत असतात. मोकळ्या महामार्गावर चालक भरधाव वेगात गाड्या चालवत आहेत. त्यातच त्यांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याचं समोर येत आहे. दरम्यान नागरिकांकडून हा महामार्ग लवकरात लवकर अधिकृतपणे खुला करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 701 किमी लांबीचा, 8 पदरी, 120 मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग आहे. महाराष्ट्राची राजधानी ते उपराजधानी यांना जोडणारा हा महामार्ग  10 जिल्ह्ंयातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जाणार आहे. या मार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास 8 तासात करणं शक्य होणार आहे. सध्या या महामार्गावर अंतिम टप्प्यातील काही कामं सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनाने रस्त्याचा आढावा घेतला होता.