Nana Patole: महागाईविरोधात काँग्रेस 31 मार्च रोजी राज्यभर करणार आंदोलन, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
Nana Patole (Photo Credits-ANI)

वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस (Congress) 31 मार्चपासून राज्यभर आंदोलन सुरू करणार (Congress Agitation Against Inflation) आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ही माहिती दिली आहे. ही माहिती देताना ते म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला हैराण करणाऱ्या महागाईच्या विरोधात आवाज उठवत केंद्रातील झोपलेल्या भाजप सरकारला (BJP Govt) जागे करण्यासाठी येत्या 31 मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईतील टिळक भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या परिषदेला माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री अनीस अहमद, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष एम.एम.शेख उपस्थित होते.

यावेळी नाना पटोले म्हणाले, 'निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची हिंमत भाजपमध्ये नव्हती, त्यामुळेच भाजपने निवडणुकीपर्यंत इंधन दरवाढ रोखून धरली होती. मात्र निवडणुका संपल्यानंतर लगेचच जनतेवर महागाईचा बोजा टाकण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 3.20 रुपयांनी महागले आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातही 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सीएनजी, पीएनजी गॅस आणि खाद्यतेलाच्या दरातही वाढ झाली आहे. 1 एप्रिलपासून औषधांच्या किमतीही वाढणार आहेत. जनता महागाईच्या खाईत लोटणार आहे, मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जनतेच्या दु:खाशी आणि वेदनांशी काहीही देणेघेणे नाही.

आंदोलनात सगळे नेते होणार सामिल

पुढे नाना पटोले म्हणाले, 'मोदी सरकारच्या निर्णयांचा कहर जनतेवर होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यामुळे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करणार आहेत. महागाईमुक्त भारताच्या मागणीसाठी 2 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान जिल्हा मुख्यालयात धरणे, निदर्शने, आंदोलने केली जाणार आहेत. 7 एप्रिल रोजी मुंबईतील राज्य मुख्यालयात महागाईमुक्त भारताच्या मागणीसाठी धरणे, निदर्शने आणि आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. (हे देखील वाचा: Mumbai: 'मातोश्री'ला दोन कोटींची भेट, अनेक व्यवहारांवर शंका; आयटी तपासात मोठा खुलासा)

संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नाविरोधात आणि सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात डाव्या पक्षांच्या कामगार संघटनांकडून 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. या संपाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.