Mumbai High Court: परमबीर सिंह, रश्मी शुक्ला, अनिल देशमुख यांच्यासह राज्य सरकारच्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
Anil Deshmukh,Rashmi Shukla,Parambir Singh | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आज काही याचिकांवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. परमबीर सिंह (Parambir Singh), रश्मी शुक्ला (Rashmi Shukla), अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि महाविकास आघाडी सरकार यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिका आहेत. प्रसारमाध्यमे आणि इतर माध्यमांतू एकमेकांवर येथेच्छ दोषारोप करुन झाल्यावर या सर्वांनीच अखेर न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालय आज सर्वांची बाजू ऐकूण घेण्याची शक्यता आहे. आज न्यायालयामध्ये नेमके काय घडते याबाबत उत्सुकता आहे.

प्राप्त माहितीनुसार, दाखल याचिकांपैकी बहुतांश याचिका या आपल्यावर दाखल झालेल्या याचिका रद्द करण्याचे आदेश द्यावेत या मागणिसाठीच आहेत. राज्य सरकारकडून आपल्यावर दाखल झालेले एफआयआर रद्द करावेत अशी मागणी रमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांनी याचिकेद्वारे केली आहे. तर दुसऱ्या बाजूला सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करवा अशी मागणी अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारने याचिकेद्वारे केली आहे. (हेही वाचा, Beed: बीड येथील लसीकरण केंद्रावर डिव्हायएसपी संतोष वाळके यांना धक्काबुकी, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद)

परमबीर सिंह यांनी 100 कोटी रुपये जमा करण्याच्या कथीत आरोपावरुन सीबीआय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करत आहे. या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात दिल्ली येथे एफआयआर नोंदवला आहे. दुसऱ्या बाजूला परमबीर सिंह यांच्यावरही पोलिसदलातीलच काही अधिकाऱ्यांनी आरोप केले आहेत. त्यावरुनही परमबीर चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याबाबत सांगायचे तर वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररित्या अनेक नेते, मंत्री आणि अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. याशिवाय पोलीस दलामध्ये बदल्यांवरुन होत असलेले राजकारण आणि 'अर्थ'पूर्ण देवाणघेवाण एक अहवालही राज्य सरकारला सादर केला होता. यांसारख्या विविध मुद्यांवरुन सध्या त्यांचीही चौकशी सुरु आहे.

दरम्यान, परमबीर सिंह यांचे आरोप, रश्मी शुक्ला यांचा अहवाल आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप. या सगळ्यांवरुनच राज्यात मोठीच खळबळ उडाली. महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारबाबत देशभरात चर्चा सुरु झाली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आता हे सगळेच लोक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे आज न्यायालयात काय होते याबाबत उत्सुकता आहे.