संजय निरुपम म्हणजे 'परप्रांतीय भटका कुत्रा' ; मनसेचा सोशल मीडियातून पलटवार
मनसे पोस्टर (Photo Credit: Social Media)

उत्तर भारतीयांमुळेच मुंबई चालते अन्यथा मुंबई ठप्प होईल, असे विधान करणाऱ्या संजय निरुपमवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यंगचित्रातून पलटवार केला. संजय निरुपम हा भटका कुत्रा असून त्याला आधी मुंबईतून बाहेर काढले पाहिजे, असे विधान मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.

नागपूरमधील उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात. त्यांनी काम बंद केल्यास मुंबई ठप्प होईल, असे संजय निरुपम म्हणाले होते. दूध विकण्यापासून टॅक्सी चालवण्यापर्यंत अशी सर्व कामं उत्तर भारतीयच करतात. त्यांनी कामे केली नाहीत तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल, असेही त्यांनी म्हटले होते. हे वाचा:  उत्तर भारतीयांमुळेच मुंबई चालते, त्यांनी ठरवलं तर महाराष्ट्र ठप्प- संजय निरुपम

निरुपम यांच्या या विधानाचा मनसेने खरपूस समाचार घेतला आहे. ठाण्यातील पत्रकार परिषदेत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संजय निरुपम यांच्यावर निशाणा साधला.

संजय निरुपम हा कुत्रा आहे. आधी त्याला महाराष्ट्रातून बाहेर काढले पाहिजे. ही घाण मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये वाद निर्माण करत आहे. महाराष्ट्रातील लोकांनी एकत्रितपणे निरुपमला ठेचायला हवे. घाणेरडे कृत्य करणाऱ्या उत्तर भारतीयांना निरुपम पाठीशा घालतात, अशी टिका त्यांनी केली.

सोशल मीडियावर मनसेने निरुपमविरोधात पोस्ट केली आहे. निरुपम यांचे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.