Raj Thackeray On Demonetisation: नोटबंदी, त्र्यंबकेश्वर आणि हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर राज ठाकरे यांचे रोखठोक वक्तव्य
Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील आणि देशातील विविध घटना घडामोडी आणि केंद्र सरकारचे निर्णय यांवर स्पष्ट शब्दांमध्ये भाष्य केले आहे. केंद्र सरकारने नोटबंदी (Demonetisation) संदर्बात राबवलेल्या धोरणावर काहीसा टीकात्मक पवित्रा घेत राज ठाकरे यांनी नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर हि वेळ आली नसती, अशा शब्दांत केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील वाद आणि हिंदू मुस्लिम (Hindu-Muslim Issue) मुद्द्यांवरही भाष्य केले.

नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही

राज ठाकरे यांनी म्हटले की, नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर हि वेळ आली नसती. सुरुवातील जेव्हा दोन हजार रुपयांच्या नोटा आणल्या गेल्या तेव्हा त्या एटीएम मशिनमध्ये भरल्याही जात नसत. याचाच अर्थ तेव्हा साधी तपासणीही केली नव्हती. म्हणजे कोणताही पूर्वनियोजन नव्हतं. असं काय सरकार चालतं का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

परंपरा थांबविण्यात अर्थ नाही

महाराष्ट्रातील सांस्कृतीक वर्तुळात पेच निर्माण करणाऱ्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात सुरु असलेल्या वर्षानुवर्षांच्या परंपरेवुन सुरु झालेल्या वादावर राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी आहेत कि जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा आढळून येतो. माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यावर उरूसावेळी तिथे जी चादर चढवली जाते ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चढवतो. इतर धर्माचा कुणी माणूस आपल्या धर्मात किंवा धर्मकार्यात आला तर लगेच धर्मभ्रष्ट व्हायला हिंदू हा इतका कमकुवत धर्म आहे का? मीही अनेक दर्ग्यामध्ये, मशिदीमध्ये गेलोय. आपल्याच धर्मात फक्त काही जातीनांच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. असले वाद घालणारी लोकं कोत्या मनोवृत्तीची. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी त्या वादावर बोलावं बाहेरच्यांनी यात काही पडायची गरज नाही. ह्यात कुणाला दंगली घडवायच्या आहेत का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, Raj Thackeray Nashik Tour: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तीन दिवसांचा नाशिक दौरा, शहरात पक्षाचा संघटनात्मक आढावा घेणार)

दंगली घडवायला काहीतरी खोदून काढायचं हे योग्य नाही

ज्या गोष्टी चुकीच्या त्या चुकीच्याच. म्हणून मी त्रास देणाऱ्या मशिदींवरच्या भोंग्यांवर बोललो. माहीम समुद्रातील मजारीवर बोललो... गडकिल्ल्यांवर पण काही ठिकाणी अनधिकृत दर्गे उभे राहतात तेही हटवलेच पाहिजेत. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर तुम्ही प्रहार केलाच पाहिजेत. पण जाणून बुजून दंगली घडवायला काहीतरी खोदून काढायचं हे योग्य नाही, असेही मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी आतापर्यंतचा महाराष्ट्रात जिथे मराठी मुसलमान राहतात तिथे कधी दंगली होत नाहीत, कारण ते पिढानपिढ्या ते महाराष्ट्रात राहतात, मराठीत बोलतात असा दाखलाही दिला. तसेच अशा ठिकाणांमद्ये जे सामंजस्य आहे ते विनाकारण बिघडवू नका, असे अवानही केले.

कोकणात हजारो एकर जमिनी कोकणवासियांना फसवून विकत घेतल्या जात आहेत. दलाल, अधिकारी यांच्या संगनमताने जमिनी गिळल्या जात आहेत. जैतापूरचा प्रकल्पाचं काय झालं? काहीच नाही. ती कंपनी बुडाली. तिथे जमीन विकत घेतलेली आहेच मग तिथे का नाही नेत तो प्रकल्प? कोकणी भूमिपुत्राकडून दलालांनी, धनदांगडग्यांनी जमिनी जिथे विकत घेतल्या आहेत तिथे प्रकल्प नेतात आणि मग सरकारकडून हजार पटीने भाव काढून घेतात. मग प्रकल्प झाला काय आणि नाही झाला काय यांना काहीच फरक पडत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजपने केलेल्या टीकेवर राज ठाकरे म्हणाले, मी कर्नाटकच्या निकालावर प्रतिक्रिया दिली तर भाजप म्हणतं, "आमच्याबाबतीत कुणीही बोलू नये." म्हणजे हे कशाच्याही बाबतीत बोलणार पण ह्यांच्याबाबतीत कुणी बोलायचं नाही. हा कोणता उद्दामपणा ? देशात ईडी-काड्यांचे व्यवहार फार सुरु आहेत. एक लक्षात ठेवा कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही, उद्या दुसरं सरकार येईल तेव्हा ते दामदुपटीने बदला घेतील म्हणून सत्ताधाऱ्यांनी चुकीचे पायंडे पाडू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला.