राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मराठीमध्ये अभिभाषण; जनतेवर आश्वासनांचा पाऊस, पहा यादी
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: ANI)

काल आणि आज महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडले. यामध्ये काल महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव मांडला, तर आज राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी अभिभाषण केले. प्रथम कोश्यारी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, नवनिर्वाचित सदस्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भर देत,  जनतेसाठी अनेक आश्वासने दिली.

राज्यपालांनी अभिभाषणात दिलेली आश्वासने -

> हवामान बदलाच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी पावले उचलू

> भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्या संदर्भात आरक्षणाचा विशेष कायदा आणणार

> गरिबांचे पोट भरण्यासाठी दहा रुपयात जेवणाची थाळी

> शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यासाठी प्रयत्न करु

> पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल.

> बेरोजगारी कमी करताना भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य देऊ

> मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी मुंबईत आणि ऐरोली येथे केंद्र स्थापन करु

> गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू

दरम्यान, आज सकाळी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. दुपारी  भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 4 वा राज्यपाल कोश्यारी यांनी अभिभाषण केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' हा डायलॉगवर प्रचंड टीका झाली. देवेंद्रजी पुन्हा येईन असे म्हणत होते, मात्र कोणत्या भूमिकेत येतील हे त्यांनी सांगितले नव्हते असे महाविकास आघाडीच्या आमदारांचे म्हणणे होते.