राजू शेट्टी सरड्याप्रमाणे रंग बदलतात; माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांची खोचक टीका
सदाभाऊ खोत (PC - ANI)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर टीका करताना 'भंपक' आणि 'फालतू' माणसासोबत पुन्हा काम करणार नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे माजी कृषी राज्य मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेटी यांच्या वक्तव्यावर सांगलीमधील इस्लामपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली आहे. 'राजू शेट्टी सरड्याप्रमाणे रंग बदलतात,' अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच राजू शेट्टींसारख्या भंपक माणसाविषयी फार बोलावं, अशी माझी इच्छा नाही असंही यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले.

दरम्यान, यावेळी सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीकांची तोफ डागली. सदाभाऊ म्हणाले की, आमच्यासारख्या फालतू माणसांमुळेचं तुमची संघटना मोठी झाली. आमच्यासारख्या माणसांमुळेचं तुम्ही आमदार, खासदार झालात हे विसरलात काय? मला तुमच्यासारखं सरड्यासारखे रंग बदलता येत नाही. कोरोना संकटामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. निकृष्ट बियाणं, दूध दर यावरुन शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता शेतकरी प्रश्नावर लक्ष द्यावं, असंही सदाभाऊ यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Swachh Survekshan 2020 Results: स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या स्थानी; 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत कराड, सासवड, लोणावळा टॉप 3 मध्ये)

राजू शेट्टी यांनी नेहमी प्रसिद्धीत राहायचं असतं. त्यामुळे ते सतत माझं नाव घेत असतात. मात्र, मला त्या भंपक माणसाविषयी जास्त बोलण्याची इच्छा नाही. स्वाभिमानी पक्षाने आता केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही यावेळी सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना दिला. राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून माजी खासदार राजु शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं.