MNS: ठाणे, वसई-विरारमध्ये भाजप-शिवसेनेला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
MNS | Image Used For Representative Purpose (PC - Twitter)

मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC Election 2022) तोंडावर आली असतानाच मनसे (MNS) ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी भाजप-शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. यात सुनील यादव, राम कदम यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांचा भरणा आहे. यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या अगामी निवडणुकीत मनसेला अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनपासून मनसेचे कार्यकर्ते विविध मागणींसाठी आंदोलन करताना दिसत आहेत. याचा पक्षाला किती फायदा होणार? हे मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. महत्वाचे म्हणजे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे कोणती भुमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणूकीत मनसेने जोरदार प्रचार करत भाजपच्या नाकी नऊ आणले होते. त्यावेळी महाराष्ट्रात मनसेची जादू दिसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यावेळी पक्षाचा केवळ एकच आमदार निवडून आला होता. हे देखील वाचा- शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांचे जिवंतपणीचं श्राद्धे घातले; संजय राऊत यांचा अमित शहा यांच्यावर पलटवार

गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या डोंबिवलीमध्ये (Dombivli) मनसेला मोठे खिंडार पडले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवलीचे शहाराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मनसे कार्यकर्त्यांनी हातावर शिवबंधन बांधून घेतली होती. मात्र, आता शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.