BDD Chawls Redevelopment: माजी मुख्यमंत्र्यांनी घाईघाईत नारळ फोडला; आदित्य ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
Aditya Thackeray | (Photo Credits-Facebook)

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे (BDD Chawls Redevelopment) काम आज प्रत्यक्षात सुरु झालं आहे. केवळ नारळ फोडून झाला नाही. विविध साईट्सवर प्रत्यक्षात काम सुरु आहे. या आधीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी घाईघाईत नारळ फोडला होता. पुढं काय झालं हे सर्वांनाच माहीत आहे, असा टोलाही मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना लगावला आहे. मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आणि गेली अनेक वर्षे रखडलेल्या बीडीडी चाळ (BDD Chawls) पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींच्या पुनर्वसन बांधकामाचे आज (1 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन स्वरुपात उपस्थित होते.

या वेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर आज माझे कौतुक होते आहे. पण हे माझे एकट्याचे काम नाही. यात अनेक लोकांचे हात आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर त्यांच्या फोनमध्ये माझे नाव 'बीडीडी' असं सेव्ह केलं असेल. इतक्यांदा या कामासाठी मी फोन केला. त्यांनीही तत्काळ प्रतिसाद दिला. त्यातून हे काम पूर्णत्वास जात आहे,, अशी आठवण आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितली.

ट्विट

आदित्य ठाकरे यांनी या वेळी प्रकल्पाबाबत सांगताना म्हटले की, या प्रकल्प पूर्ण केला जावा ही मागणी करुन कंत्राटदारही कंटाळले होते. या संदर्भात जवळपास 50 बैठका झाल्या. शेवटी हा प्रकल्प पूर्णत्वास आला. आजचा क्षण केवळ मुंबई, राज्यच नव्हे तर देशासाठी महत्त्वाचा आहे, अशी भावनाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.