Crime: बंगळूरूमध्ये गोबी मंचुरियनवरून केली आजीची हत्या; 6 वर्षानंतर कोल्हापूर येथे लपून बसलेल्या नातवाला अटक
Representational Image (Photo Credits: PTI)

बेंगळुरू पोलिसांनी (Bengaluru Police) फक्त गोबी मंचुरियनवरून (Gobi Manchurian) घडलेला 6 वर्षे जुना खून खटला सोडवला आहे. हत्येनंतर महाराष्ट्रात पळून आलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. द न्यू इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, ऑगस्ट 2016 मध्ये एका 70 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती. आता 6 वर्षानंतर पोलिसांनी तिची मुलगी आणि नातवाला अटक केली आहे ज्यांचा या हत्येमध्ये कथित सहभाग आहे. या दोघांना महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून अटक करण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, बेंगळुरूच्या केंगेरी सॅटेलाइट टाउन परिसरात राहणारा 27 वर्षीय संजय वासुदेव राव याचा गोबी मंचूरियनच्या पॅकेटवरून आजी शांता कुमारी यांच्याशी शाब्दिक वाद झाला होता. शांता कुमारीला जेवण आवडले नाही ज्यामुळे त्यांच्यात हे भांडण झाले. त्याचवेळी चिडलेल्या संजयने कथितपणे त्याच्या आजीची हत्या केली आणि आई शशिकला हिच्या मदतीने तिचा मृतदेह घरात पुरला. मृतदेह पुरण्यासाठी संजयने त्याचा मित्र नंदेश याचीही मदत घेतली.

या सर्वांनी मृतदेह कोळसा आणि सिमेंटने झाकून घरातील एका कोठडीत पुरल्याचा आरोप आहे. त्यानंतर, संजय आणि त्याची आई शशिकला यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये ते घर सोडले व दोघेही कोल्हापुरात येऊन राहू लागले. पुढे मे 2017 मध्ये, घराचे नूतनीकरण करत असताना, घरमालकाला घरात कुजलेला मृतदेह आढळला. त्यानंतर त्याने ताबडतोब याची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली व त्या प्रकरणी नंदेशला ताब्यात घेतले. (हेही वाचा: Crime: आधी महिलेचे प्रियकरासोबत पलायन, नंतर दारुच्या नशेत पोटच्या 4 वर्षीय मुलाला विकले, दोघांना अटक)

नंदेशवर गुन्ह्याचा पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला. पोलिसांना संजय व त्याची आई महाराष्ट्रातील कोल्हापुरात पळून गेल्याची माहिती मिळाली. संजय एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होता तर त्याची आई कोल्हापुरात मोलकरीण म्हणून काम करत होती. बेंगळुरू पोलिसांनी बँक केवायसीच्या मदतीने दोघांना पकडले. आरोपींनी कोल्हापुरात बँक खाते उघडण्यासाठी त्यांचे तपशील दिले होते. पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.