
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा (Deulgaon Raja) तालुक्यातील शिवणी अरमाळ (Shivani Armal) येथील रहिवासी असलेल्या कैलास नागरे यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे. कैलास हे शेतकरी आहेत. धक्कादायक म्हणजे त्यांना युवा शेतकरी पुरस्कार (Young Farmer Award) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ऐन होळीच्या दिवशी त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. हे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी 30 पानांची चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून पंचक्रोशीतील शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी ते प्रयत्नशील होते. प्रशासन आणि सरकारने या आधी अनेक आश्वासने दिली मात्र त्यांची पूर्तता न केल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आत्महत्येपूर्वी 30 पानांची चिठ्ठी
शेतकरी आत्महत्या झाल्याने गावामध्ये खळबळउडाली आहे. कैलास नागरे हा युवा शेतकरी सुरुवातीपासूनच पाण्यासाठी संघर्ष करत होता. खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून पाणी आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यासाठी शासन-प्रशासनाकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा चालला होता.त्यासाठी त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये 7 दिवस अन्नत्याग आंदोलनही केले होते. त्यानंर प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत आश्वासन दिले आणि त्यांना उपोषण सोडण्यास सांगितले. दरम्यान, 26 जानेवारी रोजीदेखील त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, स्वत: पालकमंत्र्यांनीच आश्वासन दिल्याने नागरे यांनी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले. दरम्यान, दोन महिने उलटले तरीदेखील प्रशासकीय पातळीवर कोणतीच हालचाल दिसत नसल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावाच लागत होता. अशा वेळी गावकऱ्यांचे हाल न पाहावल्याने या शेतऱ्याने आत्महत्येसारखा धक्कादायक निर्णय घेतला. आपल्या आत्महत्येचे कारण त्यांनी 30 पानांच्या चिठ्ठीमध्ये लिहूनही ठेवले आहे. (हेही वाचा, Farmer Suicide in Maharashtra: राज्यात 6 महिन्यात 1,267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अमरावती विभागात सर्वाधिक संख्या)
सुसाईड नोटमधील ठळक मुद्दे
बुलढाणा जिल्ह्यातील कैलास नागरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यातील काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे:
- आमच्यकडे सिंचनाच्या सर्व सुविधा, पण पाणी नाही.
- खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
- माझ्यावर केळी, पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा.
- अंत्यविधीची राख आनंदस्वामी धरणात टाका.
- रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व विधी उरका.
- सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावे.
- मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो, स्वतः शून्य झालो अन् मुलं, बाबा, बायको यांनाही शून्य करूनच जातोय.
दरम्यान, कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या घोडचुकीमुळेच आमचा माणूस गेला असा संतप्त आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आत्महत्येबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा सुरु केला आहे. पोलिसांना आत्महत्येच्या ठिकाणी नागरे यांनी लिहीलेली 30 पानांची चिठ्ठी देखील आढळून आली आहे. दरम्यान, पंचनामा झाला असला तरी, प्रशासनाकडून नागरे यांच्या मागण्या मान्य झाल्याखेरीज त्यांच्या पार्थिवाला पोलिसांना हातही लावू देणार नाही आणि शवविच्छेदनही होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
वाचकांसाठी सल्ला: जर तुम्ही स्वत: किंवा तुमच्या परिचयातील कोणीही व्यक्ती मानसिक ताण, मानसिक आरोग्यविषयक समस्या किंवा इतर कोणत्या अन्याय, अत्याचाराच्या घटनांमुळे आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त असाल, तर कृपया व्यावसायिक मदत घ्या किंवा मानसिक आरोग्य हेल्पलाइनशी संपर्क साधा. विनामुल्य सेवा आणि माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. हे सर्व क्रमांक टोल फ्री आहेत. त्यावरुन मागितलेल्या मदत, मार्गदर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:
टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस: + ९१ + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड: 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन: – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 080-23655557; आयकॉल: 022-25521111 आणि 9152987821 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे): 0832-2252525.