Arnab Goswami Arrest Case: दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो; शेतकरी आत्महत्येवरुन निलेश राणे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
Uddhav Thackeray and Nilesh Rane (IANS and facebook)

रिपब्लिक टिव्हीचे (Republic TV) संपादक अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अटकेनंतर भाजकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्नब गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यावरुन भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव सुसाईड नोट मध्ये लिहून आत्महत्या करणाऱ्या घटनेची आठवण करुन देत कराल काय स्वतःला अटक? असा थेट सवाल निलेश राणे यांनी केला आहे. (भाजप आमदार राम कदम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला; मारहाण करणाऱ्या 9 पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी)

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिले, "कराल काय स्वतःला अटक??? न्ह्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो." सोबत त्यांनी ओमराजे निंबाळकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बातम्यांची वर्तमानपत्रातील कात्रणे जोडली आहेत.

निलेश राणे ट्विट:

काय आहे शेतकरी आत्महत्या प्रकरण?

2019 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे गावातल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ते 59 वर्षांचे होते. सुसाईट नोट मध्ये त्यांनी ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यावर फसणुकीचा आरोप केला होता.ढवळे यांची चार एकर जमिन कर्जासाठी गहाण ठेवण्यास यांनी भाग पाडले आणि ढवळे यांच्या नावे घेतलेली कर्जाची रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. पैसे नसल्याने कर्जपरत फेड करता आली नाही. त्यामुळे जमिनीचा 3 वेळा लिलाव पुकारण्यात आला. त्यामुळे फसणुकीत मानहानीची भर पडली आणि त्यातून आत्महत्या करत असल्याचे ढवळे यांनी चिठ्ठीत लिहिले होते. तसंच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख केला होता.

दरम्यान, अर्नब गोस्वामी यांना बुधवारी पनवेल येथील निवासस्थानावरुन अटक करण्यात आली असून त्यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गोस्वामी यांच्या अटकेनंतर संपूर्ण भाजप पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आणीबाणी सारखी परिस्थिती असल्याचीही टीका सातत्याने केली जाते. यातच भाजप नेते निलेश राणे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही.