400 शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याने फसवणुकीची भावना
Around 400 Shiv Sena Workers Join BJP in Maharashtra (Photo Credits: ANI)

मुंबईतील धारावी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सुमारे 400 शिवसेनेचे (Shiv Sena) कार्यकर्ते, बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) सामील झाले. पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या 7 दिवसांत ही घटना घडली आहे. शुक्रवारी, 59 वर्षीय वर्षीय शिवसेनाप्रमुखांनी मुंबईतील 'मंत्रालय' येथे राज्याचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून औपचारिकपणे पदभार स्वीकारला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तानुसार, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी, शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याशी हातमिळवणी केली. हीच गोष्ट या कार्यकर्त्यांना खटकली व त्यामुळे त्यांनी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला.

एएनआय ट्विट -

याबाबत बोलताना सेनेचे कार्यकर्ते रमेश नदेसन यांनी सांगितले की, ‘भ्रष्ट आणि हिंदु-विरोधी पक्ष यांच्यासोबत शिवसेनेने हातमिळवणी केल्यामुळे, शिवसेनेच्या 400 समर्थकांनी आपली फसवणूक केल्याच्या भावनेने भाजपमध्ये प्रवेश केला.’ शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद झाले. भाजप आपल्याशी खोटे वागला यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा: शिवसेनेने कॉंग्रेस सोबत हातमिळवणी केल्यामुळे काही शिवसैनिक नाराज; रमेश सोलंकी यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा)

भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नसल्याने, शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर विधानसभेत त्यांनी 169 आमदारांसह आपले बहुमत सिद्ध केले. दरम्यान याआधी शिवसैनिक रमेश सोलंकी (Ramesh Solanki) यांनी शिवसेनेच्या युवा सेना युनिटमधून राजीनामा दिला होता. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या युतीबद्दल त्यांनी आपला संताप व्यक्त करत पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता.