Sant Gadge Baba Death Anniversary: स्वच्छता आणि समाजकार्याला आयुष्य अर्पित केलेल्या संत गाडगे बाबा यांच्याविषयी काही रोचक गोष्टी; जाणून घ्या

संत गाडगे बाबांची आज, 20 डिसेंबर रोजी 63वी पुण्यतिथि आहे. याच निमित्ताने आज आपण त्यांच्या आयुष्याशी निगडित काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहुयात संत गाडगे बाबा यांचा जीवन प्रवास आणि त्यातील काही खास पैलू...

Sant Gadge Baba (Photo Credits: Laxman Raut/ Facebook)

भारत देशाला संतांची भूमी म्ह्णूनही ओळख प्राप्त आहे, या भूमीवर अनेक संत महात्म्यांनी जन्म घेऊन समाजकार्य केल्याचे दाखले आहेत. याच महान व्यक्तींमधील एक महत्वाचे नाव म्हणजे संत गाडगे बाबा (Sant Gadeg Baba). अमरावती (Amravati) मधील शेणगांव (Shengaon) येथे जन्मलेल्या डेबुजी झिंगराजी जानोरकर (Debuji Zingroji Janorkar) यांनी आपले आयुष्य समाजकार्य आणि स्वच्छतेला समर्पित केले होते. कर्मयोगी, बुद्धिवान आणि परोपकारी व्यक्तिमत्व असणाऱ्या गाडगे बाबांची आज, 20 डिसेंबर रोजी 63वी पुण्यतिथि आहे. याच निमित्ताने आज आपण त्यांच्या आयुष्याशी निगडित काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहुयात संत गाडगे बाबा यांचा जीवन प्रवास आणि त्यातील काही खास पैलू...

13 फेब्रूवारी 1876 रोजी गाडगे महाराज यांचा जन्म झाला. सर्वसाधारण कुटुंबातील मुलांप्रमाणेच त्यांचे बालजीवन झाले कालांतराने त्यांचे लग्न होऊन त्यांना , कन्यारत्न प्राप्त झाले. मात्र संसारात मन रमत नसल्याने त्यांनी समाज कार्यात स्वतःला वाहून घेण्याचे ठरविले आणि या उद्दिष्टाचे पूर्ती करण्यासाठी, 1 फेब्रूवारी 1905 रोजी पहाटे 3 वाजता जगाचा संसार सुखी करण्यासाठी डेबूजी घराचा निरोप घेतला.

संत गाडगे बाबा हे स्वतः अशिक्षित असले तरी त्यांचे ज्ञान मात्र भल्याभल्यांना मागे टाकेल असे होते. म्ह्णूनच त्यांनी आपल्या संजाकार्यातून शिक्षणाचा प्रसार करण्याला नेहमी महत्व दिले. असं म्हणतात, अनेक संतांचे अभंग गाडगे बाबांना अगदी तोंडपाठ होते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ असा गजर केल्यानंतर हरिपाठ म्हणत त्यांनी प्रबोधनाचे कार्य केले.

गाडगे बाबांचे नाव हे स्वच्छतेसाठी खास ओळखले जाते, त्यांनी लोकांच्या वैचारिक स्वच्छते सोबतच प्रत्यक्ष परिसराची स्वच्छता देखील महत्वाची आहे हे ओळखले होते, म्ह्णूनच ते आपल्या कार्यासाठी ज्या गावात जात असत तिथे गेल्यावर सर्वात आधी आपल्या हातात झाडू घेऊन रस्ते झाडून काढत गावातील नाले, गटारे स्वच्छ करीत असे, या कार्यसाठी गावकरी त्यांना पैसे देखील द्यायचे मात्र ते स्वतःसाठी न वापरता समाजकार्यात त्यांनी दान केल्याचे सांगितले जाते.

गाडगे बाबा गावोगावी फिरत कीर्तन करायचे, त्यांच्या या कार्याची ख्याती इतकी होती की केवळ गाडगे बाबांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोक दूर गावावरूनही पोहचत असे. या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, साधी राहणी, परोपकार, या विचारांचा प्रसार केला.

महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपर्यात गाडगे बाबा यांनी धर्मशाळांची बांधणी केली आहे. पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई ही त्यातील काही मुख्य ठिकाणे म्ह्णून ज्ञात आहेत. यासोबतच विद्यापीठे, रुग्णालय, गोशाळा यांच्या निर्मितीला देखील त्यांनी हातभार लावला.

समाजासाठी काम करताना गाडगे बाबा यांनी स्वतःच्या आरामाला कधीच महत्व दिले नाही, त्यामुळेच त्यांनी आयुष्यभरात ना कधी स्वतःसाठी कपडे घेतले ना कधी राहण्याचे घर, त्यामुळेच अंगावर चिंध्याची गोधडी, पायात तुटक्या पादत्राणांचे विजोड, आणि डोक्यावर मातीचे एक मडके अशाच रूपात लोकांनी त्यांना बघितले आहे.

संत गाडगे बाबा यांनी 20 डिसेंबर 1956 मध्‍ये वलगाव, अमरावती येथे अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांच्या कार्याची ख्याती अबाधित आहे. त्यांचे स्वच्छता कार्य पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक धर्मशाळा, सामाजिक संस्था 'गाडगे महाराज स्वच्छता मिशन'चे कार्य पाहत आहेत तर अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा विद्यापीठ असे नाव देऊन त्यांच्या शिक्षणप्रसार कार्याला सन्मानित केले गेले आहे. अशा या महान व्यक्तिमत्वाच्या स्मृतीला आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मनःपुर्वक श्रद्धांजली!

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement