'उद्या ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढू'- Kirit Somaiya फोडणार नवा बॉम्ब
Kirit Somaiya | (Photo Credits: IANS)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचा आणखी एक घोटाळा आपण बाहेर काढणार असल्याचे, भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गुरुवारी सांगितले. पत्रकार परिषदेला संबोधित करताना सोमय्या म्हणाले, ‘उद्या मी ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढेन. सरकार माझ्यापर्यंत का पोहोचले नाही, याचे उत्तरही मी देईन.’ त्यांनी पुढे महाविकास आघाडीमधील अशा काही नेत्यांची नावे नमूद केली ज्यांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. यामध्ये अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिक, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार आणि इतरांनी नावे समाविष्ट होती.

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरुद्ध आयएनएस विक्रांतच्या आर्थिक गैरव्यवहारासाठी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 420 (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण), 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद करण्यात आलेली नौदल विमानवाहू नौका विक्रांतला वाचवण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात, मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी किरीट सोमय्या यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले.

दुसरीकडे, विक्रांत वाचवण्यासाठी शिवसेनेने समर्थन दिले होते. संजय राऊत यांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणता, असा आरोप सोमय्या यांनी केला. नियमाप्रमाणे मी किंवा वकील जाऊ शकतात. आम्ही न्यायालयात सगळी माहीती देत आहोत, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले. (हेही वाचा: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची MNS ची मागणी; दिला आंदोलनाचा इशारा)

दरम्यान, आयएनएस विक्रांत हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. सप्टेंबर 22, 1945 रोजी या जहाजाचे उद्घाटन करण्यात आले. या जहाजाने 1965 व 1971 सालांच्या दोन्ही भारत-पाकिस्तान युद्धांत भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होते. जानेवारी 31, 1997 रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले.