उत्तर प्रदेश: 1 एप्रिल पासून बड्या शहरात पहाटे 4 पर्यंत दारूविक्रीला परावानगी, योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय ; 28 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
मुंबई पाठोपाठ नाईट लाईफचे वारे आता उत्तर प्रदेश मध्ये देखील वाहू लागले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार येत्या 1 एप्रिल पासुन बड्या शहरांमध्ये रात्री 2 ऐवजी पहाटे 4 पर्यंत दारू विक्रीला परवानगी दिली गेली आहे.
नाशिक मालेगाव रोड वर झालेल्या राज्य परिवहन मंडळाची बस आणि रिक्षा मध्ये झालेल्या धडकेने बस रस्त्यानजीकच्या विहिरीत कोसळल्याचा प्रसंग समोर आला आहे. आतापर्यंत याठिकाणी मृतांचा आकडा 20 वर पोहचली आहे. तर 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारत ऑस्ट्रेलियाचा 74 धावांनी पराभव केला आहे . टीम इंडियाने दिलेले 234 धावांचे आव्हान पूर्ण करू न शकल्याने ऑस्ट्रेलियन संघाचा विश्वचषक स्पर्धेतील गेम ओव्हर झाला आहे.
दिल्ली शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांना थंडीचा अधिक सामना करावा लागणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
एएनआयचे ट्वीट-Delhi: Rain lashes parts of the city; visuals from Dr. Rajendra Prasad road area. pic.twitter.com/8K0cyVZ52l
देशातील तरूणांना देशभक्ती आणि बलिदानाचे महत्व काळाले पाहिजे, यासाठी महाविद्यालयातील कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानेच होणार , अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
दिल्लीच्या शाहीन बागेत नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारा, जेएनयूचा माजी विद्यार्थी शरजील इमाम याला दिल्ली पोलिसांनी बिहारच्या जहानाबाद येथून अटक केली आहे. त्यानंतर शरजील इमाम याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला जहानाबाद न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली आहेत. यात 10 ते 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. तसेच या सर्व कारस्थानामागे ज्येष्ठ नृत्यांगना सरोज खान आणि त्यांचे सहकारी असल्याचा आरोपही गणेश आचार्य यांनी केला आहे.
लातूर जिल्ह्याचं लवकरचं विभाजन होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार, 'उदगीर' हा नवीन जिल्हा घोषित करण्यात येणार आहे. नवीन जिल्ह्याच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठवा, अशी सूचना विभागीय आयुक्तांनी केली आहे.
पुण्यात 10 रुपयांमध्ये मिळणाऱ्या शिवथाळीला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शिवथाळीचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिक रांगेत उभा राहत आहेत. अवघ्या दोन तासांत जेवण समाप्त होत असल्याने अनेकांना या ठिकाणाहून उपाशी जाव लागत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता इशारा दिला आहे. भारतीय लष्कराने मनात आणले तर 10 दिवसांत त्यांना पराभवाची धूळ चारू शकते, अशा शब्दांत मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. दिल्लीत एनसीसी कॅडेट्सला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस, बसपा तसेच इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये भारताचे तुकडे करण्याची भाषा वापरणाऱ्या शरजील इमामला पोलिसांनी अटक केली आहे. शरजील इमामने विद्यापीठामध्ये आसामला भारतापासून वेगळं करण्याची भाषा वापरी होती.
आपण सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) समर्थन केलं नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या वक्तव्याच्या प्रसारमाध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला असं म्हणालो होतो. मात्र, याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
साताऱ्याचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील औद्योगिक वसाहतीतील 'सोना अलॉईज' या कंपनीचे राजकुमार जैन यांना मारहाण करून त्यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणातून उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांची सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या गुजरात दंगलीतील सदरपुरा गावातील 14 आरोपींना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सरन्यायाधीस एस. ए. बोबडे यांच्या नेत्तृत्वाखालील खंडपीठाने या दोषींना जामीन मंजूर केला आहे.
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी पाळणार नाहीत, असा निर्णय महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने घेतला आहे. आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी केवळ दंडावर काळी पट्टी लावण्यात येणार आहे.
कोरेगाव-भीमा प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी चौकशी आयोगाकडे केली आहे.
राज्यातल्या 22 जिल्हा मध्यवर्ती बँका आणि 8 हजार 194 प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी कर्मचारी व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना व्हायरस दिवसेंदिवस चीनमध्ये पसरत असून अनेक जण या आजाराचा शिकार होत आहेत. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1300 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली स्थिती गंभीर असल्याची कबुली अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिली आहे.
तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेवरून शिवसेनेने केंद्र सरकारवर खोचक शब्दामध्ये टीका केली आहे. 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे दावे करायचे आणि दुसरीकडे ‘कर्जबाजारी’ सरकारी कंपन्या विकून ‘दात कोरून पोट भरण्याचे उद्योग’ करायचे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने सरकारवर निशाणा साधला आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दुसरीकडे प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्या विरोधात 33 वर्षीय महिला नृत्यदिग्दर्शिकेने तक्रार दाखल केली आहे. पीडितेने गणेश आचार्य अश्लील व्हिडिओज बघण्यास बळजबरी करत असल्याचा आरोप केला आहे.