छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सरकार शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करणार असल्याची माहिती, उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आज मंत्रालयात क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातील खेळाडूंसाठी मागील वर्षापेक्षा यावर्षी अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही ते म्हणाले.
तान्हाजी चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज आणी तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमांवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा चेहरा लावलेले फोटो व्हायरल झाल्याने एकाच खळबळ उडाली होती. आता या व्टिटर हॅंडेलविरुध्द राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष महेश हांडे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. पॉलिटीकल किडा व्टिटर हॅंडेलवर हे फोटो प्रसिध्द झाले होते.
वादग्रस्त अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांची नाशिकवरून थेट मंत्रालयात बदली केली. मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिवपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र परत एकदा त्यांची बदली करत त्यांना एड्स नियंत्रण मंडळावर पाठवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्यांची बदली करत त्यांना नागपूरला पाठवले आहे.
इयत्ता बारावी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडीतील मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली आहे. येत्या अधिवेशनात त्याबाबत कायदा करण्यात येईल, अशी माहितीही देसाई यांनी दिली आहे.
आज मंगळवार दि. 21 जानेवारी 2020 पासून मुंबईच्या रस्त्यावरून नवीन वातानुकुलीत मिनी बस धावणार आहेत. ए-77 भायखळा रेल्वे स्थानक (पूर्व) ते ब्रीच कॅन्डी रूग्णालय,महालक्ष्मी रेल्वे स्थानक, हाजी अली, महालक्ष्मी मंदिर असा हा बसचा मार्ग असणार आहे. पहिली बस सकाळी 8 वाजता सुटेल, तर शेवटची बस रात्री 8.10 वा सुटणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाईल्ड मुंबई' चित्रफित पाहण्यासाठी प्लाझा सिनेमागृहात दाखल झाले आहेत. याच सिनेमागृहात 'तान्हाजी' चित्रपटाचा खेळही आहे. मुख्यमंत्री तान्हाजी चित्रपटाचाही खेळ पाहतील, असे समजते.
बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे यांच्यामुळे माझं अक्षर चांगलं झालं, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ अक्षर सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुस्तकाचे प्रकाश राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे बोलत आहेत.
सीबीआयकडून फ्रॉस्ट इंटरनेशनल लिमिटेड आणि त्याचे संचालक उदय देसाई आणि सुजय देसाई यांच्यावर 14 बँकांची 4,061.95 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल. संचालक आणि गॅरंटर्स यांच्यासह 14 आरोपींना देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी लूक आऊट परिपत्रके जारी.याप्रकरणी दिल्ली, मुंबई आणि कानपूर येथे विविध ठिकाणी शोध घेण्यात येत आहे.
26 जानेवारीपासून शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन सक्तीचे करण्यात आले आहे. ठाकरे सरकारने हा आदेश दिला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची मूलतत्वे रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णय फडणवीस सरकारच्या काळात घेतला गेला होता मात्र त्यावेळी त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक 2 वर्षांत पूर्ण करणं शक्य, असल्याचं मत राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. हे स्मारक देशातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
वाडिया रुग्णालय प्रकरणी 12 फेब्रुवारीपर्यंत तोडगा काढा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. रुग्णालयात झालेल्या गैरव्यवहाराला सरकार जबाबदार असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.
कितीही विरोध केला तरी नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घेणार नाही, असं ठाम प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ लखनऊ येथे घेतलेल्या जाहीर सभेत अमित शहा बोलत होते. नागरिकत्व सुधारणा कायदा कोणाच्याही विरोधात नाही. त्यामुळे मुसलमान तसचं कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाचं नागरिकत्व जाणार नाही. त्यामुळे किती विरोध करायचा आहे तो करा. मात्र, कोणत्याही परिस्थिती हा कायदा मागे घेतला जाणार नाही, असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं.
इंदू मिल जागेची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पोहचले आहेत. यावेळी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही उपस्थितीती लावली आहे. यावेळी शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कृती आराखड्याचा आढावा घेतला आहे.
26 जानेवारीपासून परिपाठानंतर संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. दरम्यान, परिपाठातील इतर विषय वगळण्यात आले आहेत. त्याऐवजी दररोज संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील 2 मुलांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. देशातील एकूण 22 बालवीरांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन बालकांना वीरता पुरस्कार देण्यात येणार आहे.
30 जानेवारीपर्यंत कोयना एक्सप्रेससह अन्य 6 रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून मंकी हिल ते कर्जत दरम्यान तांत्रिक तसेच देखभाल-दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. पुढील 10 दिवस ही कामे सुरू राहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत अनेक एक्सप्रेससह इतर 6 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच दिल्लीमध्ये 'पोलिटिकल कीडा' या ट्विटर हँडलवरून तान्हाजी या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपासोबत सर्वाधिक काळ असलेल्या अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळे 21 वर्षे जुनी युती तुटली आहे. शिरोमणि अकाली दलाने (शिअद बादल) निवडणुकीपूर्वी भाजपाशी युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने नागरिकता संशोधन कायद्यासाठी अकाली दलावर दबाव टाकला होता.