खवय्यांसाठी खुशखबर! हॉटेलमध्ये आता अवाजवी दर आकारण्यास बंदी
Food (Photo Credits: Instagram/theroyalmaharajaig)

लज्जतदार खाण्याचे शौकीन असलेल्या व्यक्ती नेहमीच विविध हॉटेल्स, रेस्टॉरन्टमधील पदार्थ खाण्यासाठी उत्सुक असतात. मात्र काही हॉटेल्समध्ये पदार्थांवर अवाजवी दर आकारले जातात हे खरे. पण त्या पदार्थाची चव सुद्धा आपण दिलेल्या पैशांऐवढी नसते. अशा वेळी खादाड व्यक्ती या प्रकाराबद्दल नाराजगी व्यक्त करतो. मात्र आता हॉटेल मालकांना ग्राहकांकडून पदार्थांवर लावण्यात येणारे अवाजवी दर आकारता येणार नाही आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोस याने एका पंचतारांकित हॉटेलमधून फक्त दोन केळी खरेदी केली असता त्यावर 500 रुपये आकारण्यात आले होते. त्यानंतर दोन अंड्यांसाठी चक्क 1700 रुपये एका व्यक्तीला द्यावे लागल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे हॉटेलला दंडभरपाई द्यावी लागली होती. अशा पद्धतीने जर ग्राहकांची लूट होत असल्यास त्यावर आता आळा बसणार आहे. कारण केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी याबद्दल मु्द्दा मांडला असून पदार्थांच्या अवाजवी दरावर चाप लावण्याच्या तयारीत आहेत.(मुंबई: Four Season हॉटेल मध्ये दोन उकडलेल्या अंड्यांची किंमत 1700 रुपये, नेटकऱ्यांना आठवला राहुल बोस चा प्रसंग)

काही वेळेस हॉटेलचालकांकडून सेवाकरांच्या नावाखाली ग्राहकांना लूटले जाते. याच कारणास्तव काही लोक हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जाण्यास टाळतात. मात्र आत एखाद्या हॉटेलने ग्राहकाकडून खाद्यपदार्थांवर अवाजवी दर आकारल्यास त्याचे उत्तर मालकाला केंद्र सरकार आणि अन्न मंत्रालयाला द्यावे लागणार आहे.