India National Cricket Team Milestone: बांगलादेशवर विजय मिळवून टीम इंडियाने रचला इतिहास, तब्बल 92 वर्षांनंतर केली 'ही' मोठी कामगिरी
IND vs BAN: भारतीय संघाने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, मात्र खेळाच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा संघ 234 धावांवर गडगडला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) इतिहास रचला आहे.
IND vs BAN 1st Test 2024: रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर (113 धावा, 06 विकेट्स) भारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 280 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. भारतीय संघाने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, मात्र खेळाच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा संघ 234 धावांवर गडगडला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) इतिहास रचला आहे. भारतीय संघाने 92 वर्षांच्या कसोटी इतिहासात प्रथमच ही कामगिरी केली आहे. भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील 179 वा विजय आहे, भारतीय संघाने प्रथमच कसोटी क्रिकेटमधील पराभवापेक्षा अधिक विजयांचा आकडा गाठला आहे.
92 वर्षांनी केला 'हा' पराक्रम
टीम इंडियाने 1932 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. कसोटी पदार्पणानंतर भारताने आतापर्यंत 580 कसोटी सामने खेळले आहेत. 580 कसोटी सामन्यांमध्ये भारताने 179 सामने जिंकले आहेत आणि 178 सामने गमावले आहेत. 222 सामने अनिर्णित राहिले, तर एक सामना रद्द झाला. भारताने बांगलादेशविरुद्ध 179 वा विजय मिळवला आहे. 1932 नंतर म्हणजेच 92 वर्षांच्या कसोटी इतिहासात प्रथमच टीम इंडियाने कसोटीतील पराभवापेक्षा अधिक विजयांचा आकडा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पाचवा संघ ठरला आहे. या विजयासह भारताने सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेची (179 विजय) बरोबरी केली आहे.
अशी होती संपूर्ण सामन्याची परिस्थिती
चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 515 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला. रविचंद्रन अश्विनने कहर केला आणि सहा विकेट घेतल्या. कसोटीतील त्याची पाच विकेट घेण्याची 37वी ठरली आणि त्याने या बाबतीत महान शेन वॉर्नची बरोबरी केली. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक 82 धावा केल्या.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर संपला. भारतीय संघाने दुसऱ्या डावात बांगलादेशला फॉलोऑन होऊ न देता 227 धावांची आघाडी घेऊन फलंदाजी केली. भारताने आपला दुसरा डाव 4 गडी बाद 287 धावांवर घोषित केला आणि एकूण 514 धावांची आघाडी घेतली.
बांगलादेशला 234 धावांवर ऑल आऊट केले
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 234/10 धावांवर ऑल आऊट केले. यादरम्यान रविचंद्रन अश्विनने 6 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 280 धावांनी जिंकला.