नांदेड येथे पाणीटंचाईचा बळी, संगिता गरड या महिलेचा बंदाऱ्यात बुडून मृत्यू
Drought (file image)

Drought in Maharashtra: संपूर्ण महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट तीव्र पाणीटंचाईच्या रुपात घोंगावत आहे. महाराष्ट्रातील जनतेचा पाणीटंचाईसाठी संघर्ष सुरु असताना नांदेड (Nanded) येथून धक्कादायक बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातील संगिता गरड (Sangita Garad) या 34 वर्षीय महिलेचा बंदाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही महिला कपडे धुण्यासाठी बंदऱ्यावर गेली होती. संगिता गरड या महिलेच्या रुपात नांदेड जिल्ह्यातील यंदाच्या दुष्काळाचा पहिला बळी असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

प्राप्त माहितीनुसार, संगिता गरड या माहुर तालुक्यातील हिंगणी (Hingani)गावच्या आहेत. हिंगणी गावात पाणीटंचाई भीषण स्वरुपात आहे. त्यामुळे पाण्यासाठईचा संघर्ष इथल्या महिला आणि नागरिकांसाठई नित्याचा ठरला आहे. त्यामुळे येथील बंदाऱ्यावर कपडे धुण्यासाठई संगिता गरड नावाची महिला गेली होती. दरम्यान, ती पाण्यात बुडाली आणि तिचा मृत्यू झाला.

संगिता गरड या बंदाऱ्यात बुडात असल्याचे दूर्गा नावाच्या एका स्थानिक महिलेने पाहिले होते. त्यांनी आरडाओरडा करत परिसरातील नागरिकांना या घटनेची माहिती तातडीने दिली. त्यानंतर तब्बल चार तास शोधाशोध केल्यानंतर या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. (हेही वाचा, महाराष्ट्रातील दुष्काळ: दुष्काळी तालुक्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का? इथे पाहा)

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. नागरिकांच्या शेतीला पाण्याची प्रचंड कमतरता आहेच. पण, आता प्यायच्या पाण्याचेही मोठेच दुर्भिक्ष्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे या पाणीटंचाईवर कशी मात करायची हा सवाल सध्या नांदेडकरांच्या मनात सतावतो आहे.