राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी NCP अध्यक्ष शरद पवार राजभवन येथे दाखल
Sharad Pawar, Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या भेटीसाठी राजभवन येथे पोहोचले आहे. या भेटीचे कारण अद्याप समजू शकले नाहीत. मात्र, या भेटीत कोरोना व्हायरस (Coronavirus), लॉकडाऊन (Lockdown), राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या तसेच महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष असे गेल्या काही दिवसांत निर्माण झालेले चित्र याबाबत चर्चा केली जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांच्याकडे अपत्ती निवारणाचा मोठा अनुभव आहे. तसेच, राज्याती महाविकासआघाडी सरकारचे मार्गदर्शकही आहेत. शिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर काही काळातच पवार यांची राज्यपालांशी भेट होत आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्तव आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार हे कोरोना व्हायरस संक्रमन नियंत्रणात आणण्यासाठी अपयशी ठरले आहे. राज्यातील कोरोना व्हायरसची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. अशी टीका विरोधकांकडून राज्य सरकारवर केली जात आहे. त्यातच विरोधी पक्षाचे नेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता राजभवनावर जाऊन थेट राज्यपालांशी चर्चा करतात. त्यानंतर काही तासांमध्ये राज्यपाल कोरोना व्हायरसमुळे राज्यात निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावातात. या बैठकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठ फिरवतात असे चित्र महाराष्ट्राने पाहिले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवाट लागू करावी, अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती.

शरद पवार यांनीही पाठिमागे एकदा राज्यापाल हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करतात. एकाच राज्यात दोन दोन सत्ताकेंद्र असणं योग्य नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केले होते. त्यामुळे ही सर्व परिस्थिती आणि घटनाक्रम विचारात घेता राज्यपाल आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत - संजय राऊत)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवार) राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. या सवादात त्यांनी राज्यातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या काहीशी वाढली आहे. येत्या काही काळात ती आणखी वाढू शकते. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. महाराष्ट्र सरकार योग्य ती पावले उचलत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन रुग्णालयं आणि बेड्सची उपलब्धता केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये, घाबरुन जाऊन नये. या काळात कोणीही राजकारण करु नये, असे म्हणत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.