आयएमडी कडून उद्या, म्हणजे 28 जुलै 2019 रोजी अत्यंत जोरदार पर्जन्यवृष्टीबद्दल चेतावणी देण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी समुद्राजवळ राहू नये असेही सांगण्यात आले आहे. कोणत्याही मदतीसाठी महानगरपालिकेने 1916 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आजही पाहायला मिळत आहे. मुंबई सह ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणीही मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा परिणाम रेल्वेच्या तिन्हीही सेवांवर झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने सुरु आहे. तर हार्बर रेल्वे15 मिनिटे उशिराने धावत आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही 5 मिनिटे उशिराने सुरु आहे. इतकंच नाही तर ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वेही 5-10 मिनिटे उशिराने धावत आहे.
मध्य रेल्वेची बदलापूर ते कर्जत ही लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. तसंच बदलापूर ते कल्याण ही लोकलसेवाही बंद आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाचा परिणाम केवळ रेल्वे वाहतूकीवर नाही तर विमान उड्डाणांवरही झाला आहे.विमानांची उड्डाणं 30 मिनिटे उशिराने सुरु आहेत. तसंच रस्ते वाहतूकही मंदावली आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वेही बंद करण्यात आला आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर ट्रॅफीक जॅम झाले आहे. या सगळ्याचा फटका नोकरदार वर्गाला बसणार आहे.