Maharashtra Phone Tapping Case:  फोन टॅपींग प्रकरणी IPS Officer Rashmi Shukla यांची आज चौकशी; कोरोना स्थितीचे कारण देत अनुपस्थित राहण्याची शक्यता
Rashmi Shukla | (File Photo)

महाराष्ट्रात गाजलेल्या फोन टॅपींग प्रकरणात (Maharashtra Phone Tapping Case) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांची आज (28 एप्रिल) चौकशी होणार आहे. या चौकशीबाबत मुंबई पोलीस (Mumbai Police) सायबर विभागाने (Cyber Division) रश्मी शुक्ला यांना या आधीच समन्स बजावले आहे. या समन्सनुसार आज सकाळी 11 वाजता त्यांना चौकशीला हजर राहायचे आहे. दरम्यान, रश्मी शुक्ला चौकशीला हजर राहणार का? याबाबत उत्सुकता आहे. प्रसारमाध्यमांनी रश्मी शुक्ला या कोरोनाचे कारण पुढे करत चौकशीला हजर राहणार नसल्याची शक्यता वर्तवली आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, रश्मी शुक्ला यांनी समन्सला उत्तर देताना आपल्याला जर चौकशीची घाई असेल तर प्रश्न पाठवून द्या. प्रश्नांची उत्तरं दिली जातील, असं म्हटल्याचे समजते. त्यामुळे आज नेमके काय घडते याबाबत उत्सुकता आहे.

काय आहे प्रकरण?

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या महाराष्ट्र एसआयडीमध्ये वरीष्ठ पदावर कार्यरत होत्या. या वेळी त्यांनी बेकायदेशीरपणे अनेक मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांचे फोन टॅपींग केल्याचा आरोप आहे. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी 2020 पासून त्या केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्या आहेत. रश्मी शुक्ला यांना पाठविण्यात आलेले समन्स हे महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई सायबर सेल विभागाने (Mumbai Police Cyber Division) पाठवले आहे. हे समन्स हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने पाठविण्यात आले असून, ते रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी धाडण्यात आले.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कथीत फोन टॅप प्रकरणावरुन महाराष्ट्र आणि दिल्लीच्याही राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले. या प्रकरणाची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली. तर विरोधी पक्षानेही दिल्लीवाऱ्या करत हे प्रकरण तापविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बंद लिफाप्यात काही कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह दिल्याचे फडणवीस यांनी स्वत:च सांगितले. (हेही वाचा, Maharashtra Phone Tapping Case: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स; फोन टॅपींग प्रकरणी होणार चौकशी)

दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते की, 'राज्य सरकारला मूर्ख बनवत रश्मी शुक्ला यांनी 'अ' व्यक्तीच्या फोन टॅपिंगची परवानगी घेऊन 'B' व्यक्तीचा फोन टॅप केला हे अत्यंत भयंकर आहे आणि या रिपोर्टच्या माध्यमातून महाविकासआघाडीची बदनामी करण्याचं हे एक नियोजनबद्ध केलेलं कारस्थान होतं.'