Crocodile |(Representative Image, Photo Credit: Pixabay.com)

Crocodile Attack Maharashtra: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील सिरोचा तालुक्यातील इंद्रावती नदीत 7 जून रोजी मासेमारीसाठी गेलेला तरुण (Bijapur Fisherman Killed) मगरीच्या हल्ल्यात (Indravati River Crocodile Attack) मृत्यूमुखी पडला. ही घटना शनिवारी दुपारी अंदाजे 2 वाजता घडली. मृत तरुणाचे नाव समित अंबाला (वय 22) असे असून तो छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील अत्तुकपल्ली गावातील रहिवासी होता. दुसऱ्या एका घटणेत तेलंगणातील मेडिगड्डा धरणाजवळील गोदावरी नदीत बुडून (Telangana Godavari Drowning) सहा मुले बेपत्ता झाली. दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जाळे टाकताना मगराने केला हल्ला

समित अंबाला नेहमीप्रमाणे इंद्रावती नदीच्या काठावर मासेमारीसाठी गेला होता. स्थानिक वृत्तानुसार, तो नदीत जाळे टाकत असताना अचानक एक मगर पाण्यातून वर आली आणि त्याच्या उजव्या पायाला दातांनी पकडून त्याला पाण्यात ओढून नेले. उपस्थित मित्रांनी मोठ्या आवाजात मदतीसाठी हाक मारली आणि शोधमोहीम सुरू केली. पण, बचाव असमर्थ ठरला.

तीन तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडला

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमले होते. ग्रामस्थांनी मिळून सुमारे तीन तास शोधमोहीम राबवली आणि अखेर समितचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या उजव्या पायाचे हाड मोडले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नदीकाठावरील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

तेलंगणामध्ये गोदावरी नदीत सहा बालकं बुडाली

या घटनेनंतर काही तासांतच तेलंगणामधील मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीत न्हाण्यास गेलेल्या सहा बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना 7 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता घडली.

ओढ्याच्या पाण्यात वाहून गेली बालकं

सर्व बालकं तेलंगणातील असून ते अंभटपल्ली आणि कोरलकुंडा गावातील होते. ओढ्याच्या पाण्यात अचानक आलेल्या प्रवाहामुळे ही बालकं वाहून गेली. बेपत्ता झालेल्यांमध्ये पट्टी मधुसूदन (वय 15), पट्टी मनोज (13), कर्णाळा सागर (14), तोगरी रक्षित (11) – सर्व अंभटपल्ली येथील – तसेच पांडू (18) आणि राहुल (19) – कोरलकुंडा येथील – यांचा समावेश आहे.

बचावकार्य अद्याप सुरू

पाण्याच्या पातळीत सातत्याने होणाऱ्या चढ-उतारांमुळे शोधमोहीमेला अडथळा येत आहे. पोलीस आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने शोधमोहीम उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती. तेलंगणाचे वरिष्ठ मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी घटनेची पुष्टी करत बचावकार्यातील सर्व प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

नातेवाईकांचे आक्रोश

घटनेनंतर नदीकिनारी जमलेल्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदयद्रावक होता. नातेवाईकांनी आपल्या बालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केल्या. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

छत्तीसगड व तेलंगणामधील या दोन दुर्दैवी घटनांमुळे नदीकाठच्या परिसरातील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. वनविभाग आणि प्रशासनाने नदी परिसरात मगरांची उपस्थिती लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आणि इशारे फलक लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.