Financial Help for Farmers: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मिळणार आर्थिक मदत; CM Eknath Shinde यांची ग्वाही

तातडीने पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने करावे. कांदा पिकांची सातबारावर नोंद नसली, तरी पंचनाम्यात नोंद घेऊन नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रशासनास दिल्या.

CM Eknath Shinde

महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या बनला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नाशिक जिल्ह्याला भेट दिली. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करून तातडीने मदत देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावाची पाहणी केली. तसेच त्यांनी दुपारी धाराशीव जिल्ह्यातील धारुर आणि वाडीबामणी गावांचीही पाहणी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला‌. त्यांच्या अडचणी जाणून‌ घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी‌ करण्याचे आदेश दिले. वनकुटे मधील पडझड झालेल्या‌ 22 कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तत्काळ पक्की घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

पावसाने वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे‌. कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.‌ त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. त्यानंतर शेतकरी बबनराव रामभाऊ काळे, भागा पायगुडे, बबन मुसळे व बाबाजी मुसळे यांच्या शेतीमधील कांदा, मिरची यासह डाळिंब, संत्रा, आंबे, या फळपिकांच्या नुकसानाची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानाची माहिती जाणून घेतली.

वनकुटे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे.  सतत पाच दिवस 10 मिलीमीटर पर्यंत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून समजण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे‌. नमो शेतकरी सन्मान योजनेत आता शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजारांची मदत देण्यात येत आहे. एक रूपयांत पीक विमा काढण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 10 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापुढेही मदत देण्यात येईल. (हेही वाचा: महाराष्ट्रावर अजूनही पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचे सावट; मध्य महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता)

तातडीने पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने करावे. कांदा पिकांची सातबारावर नोंद नसली, तरी पंचनाम्यात नोंद घेऊन नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रशासनास दिल्या. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबातील दोघांना प्रत्येकी 10 किलो गहू व तांदळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वाटप करण्यात आले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now