
कष्ठाने कमावलेला पैसा मोठ्या विश्वासाने छत्रपती मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था (Chatrapati Multistate Co-Operative Credit Society) ठेव म्हणून ठेवला पण, अनेकदा मागणी करुनही बँकेने पैसे न दिल्याने एका वधूपित्याने आत्महत्या () केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई शहरात घडली. सुरेश आत्माराम जाधव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव यांनी बँकेत ठेव म्हणून ठेवलेली रक्कम मुलीच्या लग्नासाठी हवी होती. त्यासाठी त्यांनी बँकेकडे चकरा मारल्या. पण अनेकदा विनंत्या करुनही पैसे न दिल्याने त्यांनी बँकेच्या प्रवेशद्वाराला गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तब्बल 11 लाख रुपयांची ठेव
छत्रपती मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या प्रवेशद्वारावर गळफास घेऊन आत्महत्या केलेले 40 वर्षीय आत्मराम जाधव हे मुळचे गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी बँकेत एक-दोन नव्हे तर तब्बल 11 लाख रुपयांची ठेव ठेवल्याचे समजते. जाधव यांच्या मुलीचे लग्न होते. त्यासाठी ते बँकेत पैशांसाठी चकरा मारत होते. पण, अनेकदा विनंती करुनही बँकेने त्यांना पैसे दिलेच नाहीत परिणामी आर्थिक चिंतेत असलेल्या जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी हजेरी लावली आणि मृततेही ताब्यत घेत पंचनामा केला. पुढील कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Mumbai Shocker: पालकांनी फोनवर गेम खेळण्यास मनाई केल्याने 14 मुलीची आत्महत्या; मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनीतील धक्कादायक घटना)
पोलीस तपास सुरु
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेला जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे. हा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत माहिती पुढे येऊ शकणार आहे. दरम्यान, जाधव यांचे बँकेत नेमके किती पैसे होते याबाबत तपास सुरु आहे. त्यांच्या खात्यावरील रक्कम आणि इतर तपशिलांची माहिती घेऊन रीतसर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
कुटुंबीयांना धक्का
बीड जिल्ह्यातील मुळचे गेवराई तालुक्यात येणाऱ्या खळेगाव येथील रहिवासी सुरेश आत्माराम जाधव यांच्या वेगवेगळ्या स्थानिक बँकांमध्ये ठेवी होत्या. सामटीव्ही डॉट ई-सकाळने दिलेल्या ऑनलाईन वृत्तानुसारछत्रपती मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक यांमध्ये जाधव यांचे अनुक्रमे 11 लाख आणि पाच लाख अशा तब्बल सोळा लाख रुपयांच्या ठेवी अडकल्या होत्या. त्यांनी मुलीचे लग्न धरले होते. त्यामुळे त्यांना पैशांची गरज होती. मात्र, सतत बँकेचे उंभरे झिजवूनही त्यांना स्वत:चीच असलेली रक्कम मिळत नव्हती. त्यामुळे ते वैतागले होते आणि पुढे निराशही झाले होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
वाचकांसाठी सल्ला: जर तुम्ही स्वत: किंवा तुमच्या परिचयातील कोणीही व्यक्ती मानसिक ताण, मानसिक आरोग्यविषयक समस्या किंवा इतर कोणत्या अन्याय, अत्याचाराच्या घटनांमुळे आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त असाल, तर कृपया व्यावसायिक मदत घ्या किंवा मानसिक आरोग्य हेल्पलाइनशी संपर्क साधा. विनामुल्य सेवा आणि माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. हे सर्व क्रमांक टोल फ्री आहेत. त्यावरुन मागितलेल्या मदत, मार्गदर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:
टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस: + ९१ + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड: 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन: – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 080-23655557; आयकॉल: 022-25521111 आणि 9152987821 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे): 0832-2252525.