Rahul Gandhi RSS Constitution Remark: आरएसएसला संविधान नव्हे, मनुस्मृती हवी आहे– राहुल गांधी

Preamble Amendment Debate: राहुल गांधी यांनी RSS वर टीका करताना म्हटले की त्यांना संविधान नको, मनुस्मृती हवी आहे. दत्तात्रेय होसबाळे यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी आरएसएसवर वर्चस्ववादी अजेंड्याचा आरोप केला.

Rahul Gandhi | (Photo Credit - X)

Manusmriti vs Constitution: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे (Dattatreya Hosabale) यांच्यावर जोरदार टीका करत आरोप केला की, संघाला संविधान नको असून मनुस्मृती हवी आहे. त्यांच्या या टीकेमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' या शब्दांचा आढावा घेण्याचा सल्ला दिल्यानंतर हे वक्तव्य केले.

राहुल गांधी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहीत म्हटले आहे की, आरएसएस आणि भाजपला संविधान नको आहे. त्यांना मनुस्मृती हवी आहे. वंचित आणि गरीब लोकांचे अधिकार हिरावून घेणे आणि त्यांना पुन्हा गुलाम बनवणे हाच त्यांचा हेतू आहे. त्यांच्या वक्तव्यातून मुखवटा पुन्हा एकदा उतरला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, संविधान त्यांना खटकते कारण ते समानता, धर्मनिरपेक्षता आणि न्याय याबद्दल बोलते. आरएसएसला हे स्वप्न पाहणं थांबवावं लागेल – आम्ही त्यांना कधीच यशस्वी होऊ देणार नाही. प्रत्येक देशभक्त भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. (हेही वाचा, Rahul Gandhi in Lok Sabha: संविधानाचा गौरव करत आरएसएस आणि सावरकर मुद्द्यावरुन राहुल गांधी बरसले)

राहुल गांधींची ही प्रतिक्रिया RSS चे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांच्या वक्तव्यावर होती. होसबाळे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द पुन्हा विचाराधीन घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. ते आणीबाणीच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित करण्यात आला होता, ज्याचे आयोजन संस्कृती मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स आणि आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र यांनी केले होते.  (हेही वाचा, RSS Reshimbagh Memorial Place: शिवसेना आणि आरएसएस विचारधारा एकच: एकनाथ शिंदे)

होसबाळे म्हणाले की, आणीबाणी ही केवळ अधिकारांचा गैरवापर नव्हती तर नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न होता. दशलक्ष लोकांना तुरुंगात टाकले गेले आणि पत्रकारितेचे स्वातंत्र्य दाबले गेले. त्यांनी असेही सांगितले की, ज्यांनी संविधान आणि लोकशाहीचा अपमान केला, त्यांनी कधीच माफी मागितलेली नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनीही होसबाळेंच्या विधानावर टीका करत, ही टिप्पणी 'अकस्मात' नसून लोकशाहीच्या पुनर्रचनेचा दीर्घकालीन अजेंडा असल्याचे सांगितले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी होसबाळेंचा बचाव करत म्हटले की, कोणताही विचार करणारा नागरिक हे समर्थन करेल, कारण हे शब्द संविधानात मूळतः नव्हते. डॉ. आंबेडकर आणि घटनासमितीने हे शब्द घातलेले नव्हते. ही BJP विरुद्ध non-BJP बाब नाही. हा विषय आहे लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचा. जे संविधानाचे खरे उल्लंघन करतात, तेच मोठे दोषी आहेत. या सर्व प्रकरणामुळे देशातील संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर नवा वाद निर्माण झाला असून, प्रस्तावनेत असलेल्या शब्दांचे भवितव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement