
Mumbai Local Train News: मुंबईमध्ये चर्चगेटकडे जाणाऱ्या विरार लोकलमध्ये महिलांसाठीच्या डब्यात झालेल्या माहाणामारीमध्ये (Virar Churchgate Train Assault) एका महिलेला जबर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत ही महिला रक्तबंबाळ झाली. धक्कादायक म्हणजे, हे प्रकरण पोलिसांमध्ये गेले असता, पोलिसांनी संशयित आरोपी महिलेकडून पैसे उकळल्याचा (Vasai Railway Police Bribery) व पीडित महिलेची समजूत काढून हे प्रकरण दाबल्याचा आरोप होतो आहे. तसेच, पीडतेस अधिकृत तक्रार करु नये यासाठी भाग पाडल्याचेही समजते. या प्रकरणावरून मोठा तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
महिलेच्या डोक्यातून रक्तस्त्राव
मुंबई लोकलच्या महिला डब्यामध्ये झालेली मारहाणीची ही घटना 17 जून रोजी चर्चगेट-विरार लोकलमध्ये घडली. पीडित महिला कविता मेढंकर (वय 31, रहिवासी विरार पूर्व) हिला, ज्योती सिंग (वय 21, रहिवासी नालासोपारा पूर्व) हिने मोबाईलने डोक्यावर मारल्याचा आरोप आहे. गाडीत चढण्याच्या वादातून ही मारहाण झाली, ज्यामुळे कविताच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. (हेही वाचा, Mumbai Local Ladies Coach Fight Video: मुंबई लोकल मध्ये महिलांच्या डब्ब्यात झिंज्या उपटत तुंबळ मारहाणीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाकडू तपास सुरू)
तक्रार नाही, सोशल मीडियातून घटना उघडकीस
जखमी असूनही त्याच दिवशी कोणतीही पोलिस तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. ही घटना केवळ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाशात आली. शुक्रवारी व्हायरल झालेल्या या क्लिपमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
कोर्टात चकरा मारण्याची दाखवली भीती
कविता मेढंकर यांना तक्रार का दाखल केली नाही, यावर त्यांनी धक्कादायक खुलासा केला. पोलिस स्टेशनला आम्हा दोघींनाही नेण्यात आलं. मी खूप घाबरले होते, असे त्या म्हणाल्या. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास सांगितलं, पण नंतर त्यांनी मला धमकावलं की केस केल्यास अनेक वेळा कोर्टात चकरा माराव्या लागतील आणि मोठा खर्च होईल. त्यांनी म्हटलं की, ज्योतीकडून जमा केलेल्या पैशांतून माझं तुटलेलं मंगळसूत्र दुरुस्त करून देतील. मी घाबरून नकार दिला आणि घरीही काही सांगितलं नाही.
कविता यांनी आरोप केला की, ज्योती सिंगकडून ₹5,000 दंड वसूल करण्यात आला, पण मला केवळ ₹2,000 मंगळसूत्रासाठी मिळाले. उरलेले पैसे पोलिसांनी स्वतःकडेच ठेवले. वसई रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी हे आरोप फेटाळले. ही घटना घडून तीन दिवस झाल्यावर आरोप समोर आले आहेत, त्यामुळे त्यावर शंका आहे. दोघींनीही तक्रार न करण्याचे परस्पर संमतीने ठरवलं होतं. त्यामुळे केवळ स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आली, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, रेल्वे पोलिस आयुक्त राकेश कालसागर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. लाच आणि गैरवर्तनाच्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. या घटनेमुळे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहराची लाईफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये अशा घटना घडणे चिंताजनक असून, पोलिस प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि जबाबदारीवर कठोर प्रश्न उपस्थित होत आहेत.