राज्यात 15 मे पासून 5 लाख 52 हजार337 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा. दिवसभरात 58 हजार231 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 35 हजार 513 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री उपलब्ध करुन दिल्याची माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन स्थिती विचारात घेऊन राज्यातील शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना वाढीव शुल्क आकारु नये, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. शिक्षणमंत्र्यांनी दिलेले आदेश हे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी लागू असून, ते राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्थांना लागू असतील.
पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांत 302 नवीन कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 11 मृत्यूची नोंद झाली आहे. एकूण सकारात्मक प्रकरणे 7314 आणि मृत्यूची संख्या 321 झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी याबाबत माहिती दिली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील विविध रुग्णालयांत Covid19 वर उपचार घेत असलेल्या,कोरोनावर मात केलेल्या & विलगीकरण कक्षात असलेल्या एसआरपीएफच्या पोलिसांची नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे विचारपूस केली. त्यांना धीर दिला. एसआरपीएफचे ५४५ पोलिस संक्रमित झाले असून ३८८ जणांना डिस्चार्ज करण्यात आले आहे.
मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता 36,710 इतकी झाली आहे. आज (29 मे 2020) दिवसभरात 1437 जणांची कोरना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. तर 38 जणांचे मृत्यू झाले, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
Earthquake: हरियाणा राज्यातील रोहतक आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. रिष्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 4.6 इतकी झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू रोहतकपासून 16 किलोमीटर अंतरावर होता. रात्री 9.08 वाजता ही घटना घडली
देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव दिसून येत आहे. कोरोनामुळे उद्भवलेली गंभीर स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या दोन दिवसांत संपेल. त्यानंतर काय होणार हा प्रश्न नागरिकांच्या मनात असला तरी त्याला अद्याप उत्तर मिळालेले नाही. परंतु, अमित शहा यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लॉकडाऊन 5 ची रुपरेषा कशी असावी याच्या सूचना मागितल्या आहेत. त्यामुळे 1 जूननंतरची परिस्थिती लवकरच आपल्यासमोर स्पष्ट होईल.
देशव्यापी लॉकडाऊनमुळे उद्भवलेले अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. श्रमिक ट्रेन्समधून मजूरांना इच्छित स्थळी पाठवण्यात येत आहे. तसंच काही उद्योगधंदे सशर्त परवानगीवर सुरु करण्यात आले आहे. दरम्यान देशावर टोळधाडीचे संकट ओढावले आहे. टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासाठी जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रात काही ठिकाणी पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. नाशिक मधील गाववाडी गावात 10 किमी चालत जावून पाणी आणावे लागत आहे. दरम्यान उन्हाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्राला हवामान विभागाने दिलासा दिला आहे. येत्या 8 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.