रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशातील कोरोना विषाणू परिस्थितीचा विचार करता, भारतातील सर्व टोल प्लाझावरील टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आपत्कालीन सेवा पुरवताना होणारी गैरसोय कमी होईल शिवाय वेळेची बचत होईल.
स्पॅनिश सरकारने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, स्पेनचे उपपंतप्रधान Carmen Calvo यांनी कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. Carmen Calvo यांची कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आली आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे भागवत कथेसाठी उत्तर प्रदेशात गेलेले परळीतील जवळपास 100 यात्रेकरू वृंदावन येथे अडकले आहेत. 3 राज्यांच्या सीमा ओलांडून त्यांना परत आणणे शक्य नाही. पालकमंत्री या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्याने तिथेच त्यांच्या राहण्याची, जेवणाची, आरोग्यविषयक सोय केली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारांसाठी केरळ येथे ब्रिटीश नागरिकाला एचआयव्ही अँटी-व्हायरल औषध दिले गेले होते. आता या रुग्णांची कोरोना व्हायरस चाचणी नकारात्मक आली आहे. एर्नाकुलम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली.
नागपूरमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांचे समूह आहेत का हे तपासण्यासाठी, तसेच घरी वेगळे ठेवण्यात आलेले लोक सूचनांचे पालन करीत आहेत का हे पाहण्यासाठी 'डोअर टू डोअर कोरोना सर्व्हे' आयोजित केला जाणार आहे. उद्यापासून या सर्व्हेला सुरुवात होणार असल्याची माहिती तुकाराम मुंढे, नगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या लढाईत सध्या राज्यातील विश्रामगृहे, वसतिगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारतींचा वापर विलगीकरण कक्ष किंवा तात्पुरत्या स्वरूपातील रूग्णालय म्हणून केला जाणर आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून, राज्यभरात 22 हजार 118 खोल्यांची सज्जता करण्यात आली आहे. या ठिकाणी 55 हजार 707 खाटांची सोय होऊ शकेल.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी स्वत:हून कोणतेच उपचार करण्यासाठी औषधे घेऊ नयेत. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे.
देशात कोरोनाची परिस्थिती पाहता कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दिवसरात्र डॉक्टर्स काम करत आहेत. तर डॉक्टर्स, नर्स किंवा अन्य प्रोफोशन्सल्स यांचे नागरिक ऐकत नसल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि डीजीपी यांना दिले आहेत.
पुढील 21 दिवसांमध्ये कोरोनाची लढाई जिंकायची आहे. दरम्यान महाभारताचं युद्ध 18 दिवसांत जिंकलं होतं. आता काशीला पुन्हा कोरोना विरूद्धच्या लढाईमध्ये सर्वांना मार्ग दाखवायचं आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका आता अधिक वाढला आहे. राज्यात कोरोनाबधितांचा आकडा 122 वर पोहचला आहे. दरम्यान मुंबई शहरामध्ये 5 नवे तर ठाण्यात 1 कोरोना बाधित रूग्ण आढळला आहे.
कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात काही गैरसमजुती असल्याने वृत्तपत्रकांचे वितरण रोखण्यात आले होते मात्र आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत झालेल्या मिटींगमध्ये 1 एप्रिल पासून वृत्तपत्रांचे वितरण 1 एप्रिल पासून पुन्हा सुरूकरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आजपासून पुढील 21 दिवस भारत देश लॉकडाऊन राहणार आहे. दरम्यान आज (25 मार्च) देशात चैत्र नवरात्र, गुढीपाडवा सारखा सण आहे. मात्र नागरिकांना यंदा घराबाहेर न पडण्याचं आवाहन केल्याने या सणाला यंदा अत्यंत साधं रूप आलं आहे. लोकांना घरातच बसून यंदा गुढीपाडव्याचा सण साजरा करायचा आहे. आज सकाळपासून नागरिक घराबाहेर पडत नसल्याने जनता कर्फ्युप्रमाणेच आता पुढे 21 दिवस जनतेकडून साथ मिळणार असल्याचं सकारात्मक चित्र पहायला मिळत आहे. देशभर लॉकडाऊन असला तरीही यामधून अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय मदत वगळण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Total Lockdown in India: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवस लॉकडाऊन, 'या' सुविधा राहणार सुरू; जाणून घ्या संपूर्ण यादी.
महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब म्हणजे आता राज्यातील सुरूवातीचे काही कोरोनाबाधित आजारावर मात करून बाहेर पडत आहेत. सुमारे 48 जणांचा रूग्णालयातील कोरोनाविरोधी लढा यशस्वी ठरला आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी आता नागरिकांना सोशल डिस्टंसिंग पाळणं हा एकमेव पर्याय अवलंबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रामध्ये नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान या लॉकडाऊनच्या काळात काही मदत हवी असल्यास +91 2026127394 या व्हॉटस्अॅप चॅटबॉटवर प्रश्न विचारा असं आवाहन करत अनावश्यक गर्दी टाळण्याचं कळकळीचं आवाहन करण्यात आलं आहे.