इटली मध्ये आणखी 627 कोरोना ग्रस्त रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा 4000 हून अधिक- AFP वृत्तसंस्था; 20 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
2012 साली घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश यांना आज सकाळी 5:30 वाजता फाशी देण्यात आली.
इटलीत कोरोना व्हायरसमुळे 627 नवीन रुग्णांचा मृत्यू झाला असून इटलीतील मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा आकडा 4000 च्या वर गेल्याचे वृत्त AFP वृत्तसंस्थेने दिला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर 22 मार्च रोजी ठेवण्यात आलेल्या 'जनता कर्फ्यू' मध्ये रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. 21 मार्च मध्यरात्रीपासून ते 22 मध्यरात्रीपर्यंत ही रेल्वे सेवा बंद राहणार आहे. तसेच या काळात एकही एक्सप्रेस मुंबईहून सुटणार नाही असेही सांगण्यात येत आहे.
जबलपूरमध्ये 4 कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यातील 3 जण हे एकाच कुटूंबातील आहेत. हे तिघे दुबईवरुन आले असल्याचे सांगण्यात येत आहेत. तर चौथा रुग्ण हा जर्मनीवरुन आलेला सांगण्यात येत आहे.
कोरोना व्हायरस ची सद्य स्थिती लक्षात घेता Air India च्या कर्मचा-यांच्या पगारातील भत्त्यात 10% ची कपात करण्यात आली आहे. कॅबिन क्रू वगळता अन्य सर्व कर्मचा-यांच्या पगारात ही कपात करण्यात आली आहे. मार्च 2020 च्या पगारापासून हे लागू करण्यात येईल.
भूषण धर्माधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी धर्माधिकारी यांना न्यायमूर्ती म्हणून शपथ दिली. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.
कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर प्रयत्न होत आहेत आपणही जिल्हा व ग्रामीण पातळीपर्यंत असे प्रयत्न करत आहोत नागरिकांनीही स्वयंशिस्त बाळगावी आणि घराबाहेर पडणे टाळावे- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन.
कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता प्रशासनाकडून सार्वजनिक मालमत्तेचं निर्जंतुकीकरण सुरु आहे. परंतु परिस्थितीचं गांभीर्य आणि प्रशासनावरचा कार्यभार पाहता रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिक स्वतःच पुढाकार घेत बस थांबे स्वच्छ करत आहेत, असे ट्विट मनसेने केले आहे.
केरळ राज्यातील कासारगोडम आणि पलक्कड येथील एकूण 12 जणांची COVID-19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 40 इतकी झाली आहे, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद ठेवण्यात आल्याने तसेच, जमावबंदी आदी कारणांमुळे राज्यभरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. राज्यभरातील एकूण कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल बंद झाली आहे.
कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर , पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर मधील सर्व दुकाने (अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त) आणि कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर नागपुरात दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने गर्दी टाळण्याचे अवाहन जनतेला केले आहे. काही शहरांमध्येही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. असे असले तरी पुणे रेल्वे स्टेशनवर मात्र प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्य पातळीवर राज्य सरकारने एखादा निर्णय घेतला असेल. परंतू, स्थानिक पातळीवर काही वेगळा निर्णय घेतला जाण्याची आवश्यकता असेल. तर तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य विभागीय आयुक्त आणि जिल्हा अधिकाऱ्यांना राज्य सरकारने दिले आहेत - अजित पवार
नागरिकांनी गर्दी टाळायलाच हवी. मग तो प्रसंग दुख:द निधन, दहावे, बारावे, लग्न असो की इतर कोणताही धार्मिक विधी. गर्दी नकोच. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लोक दारात मांडव घालून लग्न करत आहेत. कृपा करुन असे प्रकार टाळा. मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, राज्य सरकार, पोलीस या सर्वांचे आदेश, सूचना यांचे पालन करा, असे अवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी राजकारण विसरुन एकत्र यायला हवे असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांना पदावरुन दुर करण्यासाठी चाललेले सोशल मीडिया ट्रेंड पाहता राजकारण्यांनाच क्वारंटाईन करायला हवे, असा टोला संजय राऊत यांनी राजकारण्यांना लगावला आहे.
निर्भयाला न्याय मिळण्यासाठी वेळ लागला पण जे चांगले आहे ते अखेर झालेच. या निर्णयाने देशभरातील महिलांना नक्कीच आनंद झाला आहे. यामुळे महिलांवर अत्याचार करण्यापूर्वी कोणालाही भीती वाटेल, अशा शब्दांत भाजप खासदार हेमामालिनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रमोट केले जाईल. तसंच इयत्ता 9 वी आणि 11 वी च्या परीक्षा 15 एप्रिल 2020 नंतर घेण्यात येतील, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावीचे शिक्षक वगळता इतर सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करण्याची मूभा देण्यात आली आहे. तसंच 10 वीचे राहिलेले दोन पेपर्स वेळापत्रकानुसार होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
जीवनावश्यक सेवा वगळता सारं काही बंद ठेवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडता सर्व दुकाने, ऑफिसेस 31 मार्चपर्यंत बंद राहतील. मात्र लोकल, बस सेवा तसंच बँका बंद होणार नाहीत. नागरिकांनी गर्दी टाळावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
किराणा माल दुकानं, दुधाची दुकाने आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडता इतर सर्व दुकानं, ऑफिसेस, वर्कशॉप्स 31 मार्चपर्यंत बंद राहतील. मात्र मुंबईची लाईफलाईन्स असलेल्या लोकल, बस सेवा बंद होणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसंच शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50% हून 25% करण्यात आली आहे. हे सर्व निर्णय मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, नागपूर आणि मेट्रो सिटीमध्ये लागू होणार आहेत. विशेष म्हणजे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे वेतन न कापण्याचीही विनंती त्यांनी यावेळी केली.
2012 साली घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश यांना आज सकाळी 5:30 वाजता फाशी देण्यात आली. यापूर्वी अनेक कारणांमुळे या चौघांच्या फाशीच्या शिक्षेला दिरंगाई होत होती. मात्र आज अखेर त्यांना फासावर लटकवण्यात आले आणि निर्भयासह तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. यानंतर सर्वच स्तरातून विजयोत्सव साजरा केला जात आहे. (निर्भयाला न्याय मिळाला! दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार ही दोषींना तिहार जेल मध्ये फाशी)
कोरोना व्हायरसने भारत देशात शिरकाव केला असून 169 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. मात्र कोरोना व्हायरसने भीषण रुप धारण करु नये म्हणून सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवार, 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू असणार असल्याचे काल (19 मार्च) जनतेला संबोधित करताना सांगितले. जनात कर्फ्यू मध्ये सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, असे मोदींनी देशवासियांना आवाहन केले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्र राज्यातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित 48 रुग्ण असून नागरिकांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. तसंच हा महाराष्ट्र शिवरायांचा असून लढवय्या आहे असे म्हणत त्यांनी देशभरातील गंभीर स्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या जनतेचे मनोबल वाढवले.